मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकर

मुंबई : नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अंधश्रद्धेच्या आड महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या प्रकरणात पटोले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन शासनाने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. काही आक्षेपार्ह दृश्यफिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, खरातकडून महत्त्वाची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात येणार असून संबंधित मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही पटोले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय संरक्षणामुळे भोंदूगिरी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत भीतीचा धाक संपल्याने अशा घटना वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या आरोपांनंतर संबंधित चार मंत्री कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचे आरोप असलेल्या अशोक खरातविरोधात आता आणखी तक्रारी समोर येत आहेत. काही व्यावसायिकांनीही फसवणुकीचे आरोप करत पुढे येण्यास सुरुवात केली आहे. या वादात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. वाढत्या दबावानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

COMMENTS