बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून धुमाकूळ घालणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला पोलिसां

बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून धुमाकूळ घालणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. या कारवाईत चोरीस गेलेले 9 मोबाईल जप्त करण्यात आले असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरात मोटरसायकलवरून आलेल्या तीन चोरट्यांनी अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने तीन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे मोबाईल हिसकावले होते. स्वराज्य नगर परिसरात फोनवर बोलत जाणार्या महिलेचा मोबाईल, जुना धानोरा रोड परिसरात दोन महिलांसोबत चालत असलेल्या महिलेचा मोबाईल आणि के.एस.के. कॉलेज परिसरात एका नर्स महिलेचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला होता. घटनांची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ पावले उचलत डीबी पथक सक्रिय केले. प्रभारी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पथके तयार करून शहरात नाकाबंदी लावण्यात आली. संशयित वाहनांचा शोध सुरू करत अवघ्या दोन तासांत तिन्ही आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आवेश खान खाजा शेख (वय 22, केज), गणेश श्रीराम मुंडे (किल्ले धारूर) आणि ऋषिकेश लक्ष्मण वायबसे (वय 19, केज) यांचा समावेश आहे. हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिस तपासात आरोपी मोबाईल चोरी करून त्यांचे स्पेअर पार्ट्स वेगळे करून विक्री करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 9 मोबाईल हस्तगत केले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून संघटित गुन्हेगारीच्या कडक कलमांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जप्त मोबाईलचे मूळ मालक शोधण्याचे कामही सुरू आहे.

COMMENTS