पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा;अपघात टाळा!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा;अपघात टाळा!

महावितरणचे वीजयंत्रणेपासून सुरक्षिततेचे व सतर्कतेचे आवाहन

अहमदनगर: जीवनामध्ये विजेचे महत्व व फायदे अत्यावश्यक आहेचं, मात्र सावधानता बाळगली नाहीतर नुकसानही होऊ शकते. सध्या पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंव

श्रीगोंदा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र सुपेकर
वालवडमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पढेगाव सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने समारोप

अहमदनगर: जीवनामध्ये विजेचे महत्व व फायदे अत्यावश्यक आहेचं, मात्र सावधानता बाळगली नाहीतर नुकसानही होऊ शकते. सध्या पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पावसाळ्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत, विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाकडून करण्यात आले आहे.
दैनंदिन वीज वापराच्या महत्वाच्या बाबी :विजांचा कडकडाट होत असलेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणा-या विजतारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी. पावसापासून बचाव करतांना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा, कारण अनावधाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दुरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना विजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करतांना मेन स्वीच बंद करावा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका, विद्यूत वाहीनीच्याखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका, विद्युत खांब किंवा तणाव -ताराला गुरे ढोरे बांधू नका. शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका,तात्पुरते लोंबणारे वायर वापरू नका, विजेच्या अनधिकृत वापर टाळा, विशेषता विद्युत मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. वीज उपकरणे हाताळतांना पायात स्लीपर, चप्पल घालावी व विजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी, विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास १५ ते २० मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला माहिती द्यावी, जेणेकरून तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.मेनस्विचमध्ये फ्युज वायरच असावी घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्युज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ठ धातूची तार वापरली पाहिजे. अशी फ्युज वायर विजभारानुसार वापरल्यास शोर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो.
घरातील वायरिंग जुने झाले असल्यास ते बदलून घ्यायला पाहिजे. घरात ओल येत असल्यास तसेच वायरिंग जुने झाले असल्यास लिकेज करंटची समस्या वाढते. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते.टी. व्ही. नेहमी बोर्डवरील स्वीच बंद करून बंद करावा आकाशात वीज चमकत असल्यास स्वीच बंद करून प्लगपीन देखील काढून ठेवावी म्हणजे होणारे नुकसान टळेल.
दर्जेदार उपकरणांचा वापर :- घर, उद्योग, कार्यालय, अथवा शेती असो वीज वापरतांना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीज पुरवठा घेतांना किंवा वेळोवेळी विद्युत केबल स्विचेस अथवा इतर उपकरणे ही आय.एस.आय. प्रमाणित असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित कंत्राटदाराकडूनच विद्युतीकरणाची कामे करून घ्यावीत.
योग्य अर्थिंग :- वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकारची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व वायरिंग इनस्टोलेशन कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉंड कार्यक्षमपणे लावून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे.
इन्सुलेटेड वायरचा उपयोग:– अर्थ लिकेजच्यापासून होणारा धोका टाळण्यासाठी ई.एल.सी.बी.(अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर)वापरावे. मोठमोठया अपार्टमेंटमध्ये २० ते ५० मिटरची स्वतंत्र रूम असते. मात्र ब-याचवेळा त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते मिटर रूम स्वच्छ,प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मिटररूममध्ये पाणी जाणार नाही त्याच बरोबर भिंती ओल्या होणार नाही याची काळजी घ्यावी.
अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे,शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, दरम्यान, पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे,.असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा तक्रार देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी २४ तास सुरु असणार्‍या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे अँप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाईलवरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा NOPOWER (स्पेस देऊन ) ग्राहक क्रमांक टाकून हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविल्या जाईल.

COMMENTS