भोकर : तालुक्यातील शिंगरवाडी येथील शेतकरी बळीराम गंगाराम सुंकरवाड यांच्या शेतातील गोठ्याला बुधवारी (दि. 29 एप्रिल) सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या

भोकर : तालुक्यातील शिंगरवाडी येथील शेतकरी बळीराम गंगाराम सुंकरवाड यांच्या शेतातील गोठ्याला बुधवारी (दि. 29 एप्रिल) सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले.
या आगीत गोठ्यातील शेतीसाठी लागणारे साहित्य व मशागतीची औजारे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वखर, नांगर, कोळपे, तिफण, पीव्हीसी पाईप, लाकडी साहित्य, पत्रे तसेच जनावरांचे वैरण आगीत पूर्णपणे नष्ट झाले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी. दरम्यान, जयंतीनिमित्त कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पोलिस ठाणे व अग्निशमन दलाला कळविल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आणि मोठा अनर्थ टळला. घटनास्थळाजवळच मानवी वस्ती असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र गावातील तीव्र पाणीटंचाईमुळे अडचणी निर्माण झाल्या. अखेर अग्निशमन दल वेळेत दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनामा सुरू आहे. पीडित शेतकर्याला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS