नांदेड : नांदेड शहरातील नामांकित व प्रतिष्ठित समजल्या जाणार्या सावित्रीबाई फुले शाळाच्या प्रवेशद्वारासमोर नाल्याचे दूषित पाणी साचत असल्याने विद्

नांदेड : नांदेड शहरातील नामांकित व प्रतिष्ठित समजल्या जाणार्या सावित्रीबाई फुले शाळाच्या प्रवेशद्वारासमोर नाल्याचे दूषित पाणी साचत असल्याने विद्यार्थिनी, पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळेत येणार्या विद्यार्थिनींना दररोज या दुर्गंधीयुक्त पाण्यातून मार्ग काढत शाळेत प्रवेश करावा लागत असून, यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः सकाळी शाळा भरताना आणि दुपारी शाळा सुटताना मोठ्या संख्येने विद्यार्थिनी या मार्गाने ये-जा करतात. मात्र प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे त्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. अनेक वेळा पाण्याचे शिंतोडे उडून विद्यार्थिनींचे गणवेश, पादत्राणे व दप्तर खराब होत असल्याची तक्रार पालकांनी व्यक्त केली आहे. काही लहान विद्यार्थिनींना तर पाय घसरून पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. या परिसरात साचणार्या पाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ही समस्या अधिकच बिकट होत असल्याने विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत पालक वर्ग चिंतित झाला आहे. शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी अशी अस्वच्छता राहणे ही प्रशासन आणि संबंधित यंत्रणांसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनी व पालकांनी शाळा व्यवस्थापन तसेच महानगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नाल्याची साफसफाई, पाण्याचा निचरा आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थिनींना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात शिक्षणासाठी शाळेत प्रवेश मिळावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

COMMENTS