पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. बेकायदेशीररित्या सुरू असलेल्

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई परिसरात मंगळवारी दुपारी घडलेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या फटाका निर्मिती केंद्रात झालेल्या या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेकायदेशीर उद्योग आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणसई येथील एका शेतात लपूनछपून सुतळी बॉम्बसह विविध धोकादायक फटाक्यांची निर्मिती सुरू होती. दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला. स्फोट इतका तीव्र होता की, कारखान्याचा काही भाग उद्ध्वस्त झाला आणि तत्काळ भीषण आग भडकली. त्या वेळी सुमारे 32 कामगार येथे काम करत होते. सुदैवाने अनेक कामगार बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मोनिका पडवळे, मोनिका जाधव, अर्चना मिसाळ आणि जयश्री रावते या चार महिला कामगार गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाडा तालुक्यात सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर फटाका कारखान्यांवर तातडीने बंदी आणावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS