बीड : बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे जिल्ह्याची संपूर्ण दळणवळण व्यवस्था

बीड : बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे जिल्ह्याची संपूर्ण दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात बीडमधील इंधन टंचाई दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे, जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपुष्टात आला आहे. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे वाहनधारकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तासनतास ताटकळत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवसायाला बसला असून अत्यावश्यक सेवांवरही याचे सावट दिसत आहे. सध्या कृषी कामांचा वेग वाढलेला असताना डिझेलच्या टंचाईमुळे ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्री ठप्प झाली आहे. पिकांना पाणी देणे असो किंवा शेतमालाची वाहतूक, सर्वच कामे रखडली आहेत. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना आता कृत्रिम इंधन टंचाईमुळे तो हतबल झाला आहे, असे खा.सोनवणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
–
बीड जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन पुरवठा होत नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. कृषी कामांच्या या महत्त्वाच्या काळात डिझेल न मिळणे ही मोठी समस्या आहे. तरी केंद्र सरकारने संबंधित तेल कंपन्यांना तात्काळ कडक निर्देश देऊन इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा, जेणेकरून भविष्यात जनतेला अशा त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
– खा.बजरंग सोनवणे, लोकसभा सदस्य, बीड.

COMMENTS