कडा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी व उपेक्षित समाजाच्या वेदनांना प्रभावीपणे वाचा फोडली. त

कडा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी व उपेक्षित समाजाच्या वेदनांना प्रभावीपणे वाचा फोडली. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार नितीन कांबळे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या साहित्याच्या आजच्या काळातील प्रासंगिकतेचा सविस्तर आढावा घेतला. कांबळे म्हणाले, आजचा तरुण नैराश्य, बेरोजगारी आणि विविध सामाजिक आव्हानांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष, जिद्द, स्वाभिमान आणि लढाऊ वृत्ती तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील विषमता, अन्याय आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून लढा दिला. त्यांचा हा विचारांचा वारसा पुढे नेणे हे सुशिक्षित तरुणांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या “ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकर्यांच्या तळहातावर तरलेली आहे” या अजरामर विचाराचा उल्लेख करत श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांनी केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता अण्णाभाऊंचे साहित्य वाचून वैचारिक समृद्धी, सामाजिक भान आणि परिवर्तनाची जाणीव विकसित करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शिरसाठ, पिंपरी घाटा गावचे सरपंच मोहन आमटे, घाटापिंपरीचे सरपंच प्रल्हाद मुळीक, उपसरपंच संदीप शिंदे, उपसरपंच विकास आमटे, अरुण शेळके, देवळाली भाजप गणप्रमुख विलास शिरसाठ, अशोक घुमरे, दिगंबर घोडके, रावसाहेब पिंपळे, राजाराम गायकवाड, शाहुराजे झांजे, हरिभाऊ कांबळे, दीपक साबळे, राजेंद्र कांबळे, दत्तू कांबळे, हनुमंत आमटे, गणेश पोटे, दिनकर वायभासे, बलभीम आमटे, महादेव गायकवाड, निवृत्ती शिंदे, संजय मुळीक, पत्रकार राजू गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक परिवर्तनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.

COMMENTS