मुंबई : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अधिक गडद होत असतानाच, मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकन
_202605241827008885.jpg)
मुंबई : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अधिक गडद होत असतानाच, मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाशसहित पक्ष विस्ताराच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, मात्र त्याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
राज्यातील विधान परिषदेच्या एकूण १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीमधील जागावाटपाचा प्राथमिक आराखडा जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार, भारतीय जनता पक्ष सर्वाधिक १२ जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेला (शिंदे गट) ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) २ जागा देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. मात्र, या वाटपावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने सुरुवातीपासूनच अधिक जागांची मागणी केली असून, काही महत्त्वाच्या मतदारसंघांवर आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे अंतिम निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
ठाण्याच्या जागेवरून भाजप-शिवसेनेत पेच महायुतीतील सर्वाधिक पेच ठाणे विधान परिषद मतदारसंघावरून निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असल्याने हा मतदारसंघ सोडण्यास शिंदे गट तयार नाही. दुसरीकडे, भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपले संख्याबळ पुढे करत या जागेवर जोरदार दावा केला आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात भाजपची सदस्यसंख्या अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने जागावाटपात भाजपची बाजू मजबूत मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जागांची अदलाबदल करण्याचा पर्यायही चर्चेत असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी या दौऱ्याला वेगळे कारण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे हे विभागीय कामांच्या अनुषंगाने दिल्लीला गेले असून जागावाटपासाठी दिल्ली गाठल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीतील जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच विद्यमान जागाधारकांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. मात्र, संख्याबळ आणि स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन काही जागांवर फेरबदल होण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही.
महायुतीतील जागावाटपाचे सूत्र बदलणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा अंतिम तोडगा दिल्लीतूनच निघणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील समन्वय टिकवून ठेवत प्रत्येक पक्षाला समाधानकारक जागा देणे हे नेतृत्वापुढील मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटपाचे सूत्र बदलणार का? हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.

COMMENTS