बीड : शहरातून जाणार्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मार्गाचे मोठ्या नाल्या

बीड : शहरातून जाणार्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या मार्गाचे मोठ्या नाल्यासह चौपदरीकरण करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुंबई येथे झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी बीड शहर व ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा केली.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहरातून जाणारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग जालना रोड आणि बार्शी रोडमार्गे शहराबाहेर जातो. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत असल्याने वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वारंवार ट्रॅफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संबंधित मार्गाचे मोठ्या नाल्यासह चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील विविध रखडलेल्या कामांच्या प्रगतीबाबतही चर्चा करण्यात आली. याशिवाय पायाभूत सुविधा, रस्ते विकास आणि इतर सार्वजनिक हिताच्या प्रश्नांसंदर्भातील निवेदनेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसमोर मांडले बीडचे प्रश्न
बीड शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध विकासकामांसंदर्भातील प्रस्ताव आणि मागण्यांची पत्रेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आली. दरम्यान, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील विकासकामांसह इतर प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडले आहेत. त्यामुळे बीडच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS