नवी दिल्ली : राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर पंजाबमधील राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांनी प्रथमच सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्य

नवी दिल्ली : राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर पंजाबमधील राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांनी प्रथमच सार्वजनिक प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. पक्षाच्या नेतृत्वाने गुरुवारी त्यांना उपनेतेपदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच राज्यसभा सचिवालयालाही पत्र देऊन पक्षाच्या कोट्यातून चड्ढा यांना सभागृहात बोलण्याची संधी देऊ नये, अशी माहिती देण्यात आली होती.
शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमावरील आपल्या अधिकृत खात्यावर व्हिडिओ प्रसिद्ध करत चड्ढा यांनी ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली. ज्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना एकच सांगू इच्छितो माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी असा दरिया आहे, जो योग्य वेळी महापुरात बदलतो, असे ते म्हणाले.
चड्ढा यांनी पुढे स्पष्ट केले की, ते नेहमीच अशा विषयांवर बोलतात जे अनेकदा संसदेत चर्चेत येत नाहीत. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षानेच राज्यसभा सचिवालयाला आपल्याला बोलण्याची संधी न देण्याचे कळवले असल्याचे सांगत त्यांनी यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आपण सातत्याने आवाज उठवला असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्न वितरण सेवा देणार्या कर्मचार्यांचे प्रश्न, महामार्गावरील टोल दर, बँकांकडून आकारले जाणारे शुल्क, तसेच दूरसंचार कंपन्यांकडून वारंवार घेतले जाणारे रिचार्ज शुल्क या मुद्द्यांवर आपण सभागृहात भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. या विषयांमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला, मग त्यातून पक्षाचे नुकसान कसे झाले, असा सवाल त्यांनी केला. मी जेव्हा बोलतो, तेव्हा सामान्य माणसाच्या हक्कांसाठीच बोलतो. मग माझ्या बोलण्यावर मर्यादा का घातल्या जात आहेत? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS