बीड: तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि महा-ई-सेवा केंद्रांवरील रांगांमुळे खरीप पीकविमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या राज्यातील लाखो शेतकर्यांसाठी

बीड: तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि महा-ई-सेवा केंद्रांवरील रांगांमुळे खरीप पीकविमा भरण्यापासून वंचित राहिलेल्या राज्यातील लाखो शेतकर्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकरीपुत्र तथा खा.बजरंग सोनवणे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने खरीप पीकविमा भरण्याच्या मुदतीत 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागात ऑनलाईन अर्ज भरताना सतत सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि महा-ई-सेवा केंद्रांवर होणारी गर्दी यामुळे अनेक पात्र शेतकरी विम्याच्या संरक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत खा.बजरंग सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून पीकविमा भरण्याची अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. खा.सोनवणे यांनी पत्रात नमूद केले होते की, ’शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात आणि पीकविमा भरण्यास मुदतवाढ देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा.’ या मागणीची दखल घेत प्रशासकीय पातळीवर सूत्रे हलली आणि पीकविमा अर्ज भरण्याची मुदत आता 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ’ग्रीस्टॅक फार्मर आयडी’ अनिवार्य पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्यांकडे ’ग्रीस्टॅक फार्मर आयडी’ आणि डिजिटल पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मुदतवाढीचा फायदा घेऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकर्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तात्काळ आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

COMMENTS