देवळाली प्रवरा : अल्पवयीन मुलीच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या बालविवाहाच्या गंभीर प्रकरणाने राहुरी–संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. समाजात अजूनही रू

देवळाली प्रवरा : अल्पवयीन मुलीच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या बालविवाहाच्या गंभीर प्रकरणाने राहुरी–संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. समाजात अजूनही रूढी, दबाव आणि अज्ञानामुळे बालविवाहासारख्या प्रथा सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले असून पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह जबरदस्तीने लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. कायद्याने बंदी असतानाही संबंधितांनी मुलीच्या भवितव्याचा विचार न करता विवाह सोहळा पार पाडला. या प्रकारामुळे मुलीचे शिक्षण, आरोग्य आणि भविष्यातील संधींवर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विवाहास जबाबदार असलेल्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये वधू-वरांचे नातेवाईक व विवाह लावण्यात मदत करणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्ष गणेश वाघमारे करीत आहे.
दरम्यान, बालविवाह ही केवळ कायद्याचे उल्लंघन करणारी घटना नसून मुलींच्या आयुष्यावर दीर्घकालीन मानसिक, शारीरिक व सामाजिक परिणाम करणारा गंभीर अन्याय असल्याची भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. समाजाने अशा घटनांविरोधात सजग राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
मानसिकता बदलण्याची गरज
बालविवाहामुळे अल्पवयीन मुलींना शिक्षणापासून दूर जावे लागते, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि त्यांचे स्वप्नांचे आयुष्य अर्धवट राहते. त्यामुळे कायद्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS