भुजबळांनी सावित्रीमाईंना राजकीय हत्यार बनवू नये!

Homeताज्या बातम्या

भुजबळांनी सावित्रीमाईंना राजकीय हत्यार बनवू नये!

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत, यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकर

अमर्याद संपत्ती पचविण्यासाठी बायकांचे ‘माया’जाल वापरणारा अधिकारी मोपलवार !
राष्ट्रवादीचे एकत्रिकरणाची चर्चा : सहकारातून सरेंडरकडे..!
तर, जगात शांतता अशक्य…..! 

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत, यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी हंटर आयोगासमोर केलेले निवेदन असू द्या की अन्य कोणतेही कार्य, हे मानव समाजाच्या हितासाठी आणि उत्थानासाठीच केले. मानव समाजात त्यांनी कधीही भेद केला नाही. याउलट जर काही भेद असतील तर त्याचे उच्चाटन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री शिक्षण, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी शाळा असोत, की काशीबाई सारख्या ब्राह्मण स्त्रिया असोत, त्यांच्या जीवनाचे उत्थान करणे हेच त्यांचे ध्येय राहीले. त्यासाठी, हे महान दाम्पत्य समर्पित आयुष्य जगले. अशा या महान दाम्पत्याचा वैचारिक वारसा तथाकथित ओबीसी नेते म्हणविणारे छगन भुजबळ यांनी कधीतरी निभावलाय का? असा प्रश्न विचारला तर भुजबळांचा कावेबाजपणाच समोर येईल. सर्व मानव समाज शिक्षित करण्यासाठी शाळा काढणारे फुले दाम्पत्यांचा विचार कुठे आणि केवळ श्रीमंतांसाठी नाॅलेज हब सिटी उभारणारे भुजबळ कुठे! फुले दाम्पत्याच्या वैचारिक वारसाशी कोणतेही देणेघेणे नसलेले भुजबळ, अचानक सरस्वतीवर जेव्हा वक्तव्य करतात, तेव्हा, त्यांचा तो बाज कावेबाज आणि ढोंगी स्टंट असतो. ज्या भुजबळांची सांस्कृतिक बैठक नेमकी काय आहे, हे महाराष्ट्राला अजूनही कळालेले नाही, तेथे त्यांचे अचानक एखादे सांस्कृतिक वक्तव्य येणे,  या बाबीला निव्वळ राजकीय स्टंटबाजी पलिकडे काही म्हणता येणार नाही. सांस्कृतिक पातळीवर कोणताही वाद महाराष्ट्रात सध्या तरी नसताना एकाएकी वादग्रस्त वक्तव्य करण्यामागचा त्यांचा हेतू काय, हे समजावून सांगायला तज्ञांची गरज नाही. केवळ ‘बारा’मतीत गुंग झालेल्या भुजबळांनी ओबीसींच्या सांस्कृतिक चळवळीची मिरासदारी घेऊ नये. तशी नैतिकता त्यांच्याकडे कधीच नव्हती आणि नाही. मुळात त्यांचा सामाजिक – राजकीय जन्मच महात्मा फुले यांच्या विचारांविरोधात झाला आहे. ज्या शिवसेनेने कधीही फुले विचारांचा स्विकार केला नाही, त्यातूनच भुजबळ पुढे आले आहेत. याउलट, ते ज्या ब्राह्मण समाजाला साडेतीन टक्के म्हणतात, त्यांनी तर भारतीय जनता पक्षाचे माध्यमातून महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. भुजबळांनी अशा मागणीचा त्यांचे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसची केंद्रात सत्ता असताना कधी आग्रह केल्याचे दिसले नाही. शिवसेना सोडताना भुजबळांनी मंडल आयोगासाठी आपण पक्ष सोडला असे म्हटले होते, परंतु, भुजबळांनी कधीही मंडल धोरणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सत्तेचा उपयोग केला नाही. ओबीसी समाज हा वारकरी संप्रदाय असणारा समाज आहे. तो इतरांच्या श्रध्दास्थानाविषयी नकारात्मक बोलत नसतो. परंतु, भुजबळ यांनी नुकतेच केलेले वक्तव्य हे असहिष्णू प्रकारात मोडणारे असून, असे वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी केव्हाच गमावला आहे; किंबहुना, असे म्हणणे योग्य ठरेल की, भुजबळांचे आख्खे कुटुंब कर्मकांड करित असताना ते कोणत्या नैतिकतेने सरस्वती देवते विषयी बोलतात? भुजबळांची मध्ये मध्ये जी मती गुंग होते ती बारा ‘ गावचे पाणी पिण्यासाठी की काय, असे म्हणण्यावाचून पर्याय नाही. कोणतेही कारण नसताना त्यांनी महाराष्ट्रात उभा केलेला सांस्कृतिक वाद त्यांच्या पक्षाचे राजकारण शेकण्यासाठी आहे, हे काही लपून राहिलेले नाही. भुजबळांचा परिवर्तनाच्या विचारांशी काडीमात्र संबंध नाही. परंतु, ओबीसी समाजाला राजकीयदृष्ट्या वापरून घेण्यासाठी ते असा प्रकार अधूनमधून करित असतात. ही उपद्व्यापी बुध्दी ते उगाळत राहतात. आता ओबीसी समाज यांच्या या राजकीय खेळींना पूर्णपणे ओळखतो. त्यामुळे, त्यांचे सांस्कृतिक वाद उभे करण्याचे मनसुबे दुसरं तिसरं काही नसून फक्त राजकीय वातावरण तापवणे एवढाच मनसुबा असतो.

COMMENTS