अर्धापूर: दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट (NEET) परीक्षेत झालेल्या घोळामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्य

अर्धापूर: दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट (NEET) परीक्षेत झालेल्या घोळामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी दि. २३ रोजी अर्धापूर शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.
बंददरम्यान आंदोलकांनी नायब तहसीलदार राजेश शिंदे आणि पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना निवेदन सादर करून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची जोरदार मागणी केली. केंद्र सरकारच्या निष्काळजी व चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, काही विद्यार्थ्यांना जीवही गमवावा लागला आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या अर्धापूर बंद आंदोलन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS