अहिल्यानगर : सामाजिक माध्यमांवर अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेली 'कॉकरोच जनता पार्टी' ही मोहीम सध्या देशभरात लक्ष वेधून घेत आहे. प्रस्थापित राजकीय व

अहिल्यानगर : सामाजिक माध्यमांवर अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही मोहीम सध्या देशभरात लक्ष वेधून घेत आहे. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर उपरोधिक पद्धतीने टीका करणाऱ्या या मोहिमेबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकारात्मक भूमिका मांडत सरकारला तरुणांच्या भावना समजून घेण्याचा सल्ला दिला आहे.
काही संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवर या मोहिमेवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांदरम्यान अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “नाव वेगळे आणि अजब वाटू शकते, मात्र त्यामागील भावना आणि तरुणांचा सहभाग अधिक महत्त्वाचा आहे.” ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीनंतर चर्चेत आली. १५ मे २०२६ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू असताना काही तरुणांविषयी केलेल्या निरीक्षणानंतर सामाजिक माध्यमांवर या नावाने उपहासात्मक मोहीम सुरू झाली. त्यानंतर अनेक युवकांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला.
या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे म्हणाले की, देशातील तरुण शक्ती ही परिवर्तनाची ताकद असते. तरुणांमध्ये असलेली नाराजी, प्रश्न आणि अपेक्षा समजून घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. नावावरून प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांच्या भावना जाणून घेऊन सकारात्मक संवाद साधला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत युवकांचा सहभाग वाढणे ही चांगली बाब असून शासनाने अशा भावना दडपण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करायला हवा.
लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिला इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात लोकायुक्त कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. तसेच “आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावे लागते की काय?”, असे म्हणत त्यांनी एक सूचक इशारा दिला आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटचे मिळवले पुन्हा नियंत्रण ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटचे नियंत्रण पुन्हा मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी रविवारी चित्रफित (Video) प्रसिद्ध करत ही घोषणा केली. काही दिवसांपासून त्यांच्या खात्याच्या वापराबाबत अडचणी निर्माण झाल्याची चर्चा होती. अभिजित दीपके यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात, “आम्ही पुन्हा परतलो आहोत. आमच्या जिद्दीचा विसर पडू देऊ नका,” असा आशय व्यक्त केला. यासोबत त्यांनी झुरळाचे प्रतीकात्मक छायाचित्रही प्रसिद्ध केले. त्यांनी पुढे माहिती दिली की, त्यांच्या खात्यावरील ९४ टक्क्यांहून अधिक अनुयायी (Followers) भारतातील आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला की, बहुसंख्य अनुयायी भारतीय असताना भारतीय तरुणांना ‘पाकिस्तानी’ म्हणून का संबोधले जात आहे?

COMMENTS