सार्वजनिक पैशांचा गैरवापर थांबवून सत्ताधार्यांनी साधेपणाचा स्वीकार करावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने बीड येथे जिल्हाधिकार्यांमार्फत

सार्वजनिक पैशांचा गैरवापर थांबवून सत्ताधार्यांनी साधेपणाचा स्वीकार करावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने बीड येथे जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधानांनी जनतेला सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे व साधेपणा अंगीकारण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात सत्ताधार्यांच्या वर्तनात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी स्थिती असल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र, राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एका पक्षाची सत्ता असतानाही जनतेच्या करातून जमा झालेल्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. परोपदेशे पांडित्य ही भूमिका जनतेला मान्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. इतिहासाचा दाखला देत निवेदनात म्हटले आहे की, खरे नेतृत्व हे आधी कृती मग उपदेश या तत्त्वावर आधारित असते. माजी पंतप्रधानांच्या साधेपणाचा उल्लेख करत त्याग आणि आदर्श वर्तनाची गरज अधोरेखित करण्यात आली. सध्याचे राजकारण भव्य मेळावे, कोट्यवधींच्या जाहिराती, पक्षफोड आणि राजकीय व्यवहारांपुरते मर्यादित झाल्याची टीका करत उत्तरदायित्व आणि त्याग सरकारपासून सुरू झाला पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर 7 कलमी प्रति-आवाहन जाहीर करण्यात आले असून त्यात पुढील प्रमुख मागण्या आहेत- शासकीय उत्सवांवरील खर्च कमी करणे, साधेपणाचा अवलंब, लोकप्रतिनिधींच्या वेतन-भत्त्यांचा त्याग, भव्य रॅलींवरील खर्च रोखणे, परदेश दौरे टाळणे, व्हीआयपी संस्कृती समाप्त करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे तसेच एक वर्ष भ्रष्टाचारमुक्त वर्ष घोषित करणे. कार्यक्रमास माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, बीड), रफिक पठाण (जिल्हा उपाध्यक्ष), सय्यद सादिक (शहराध्यक्ष), माऊली शिंदे (जिल्हा सदस्य), कृष्णा जगताप (तालुका अध्यक्ष), आजम खान (उपतालुकाध्यक्ष), बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिवशाहू विचार मंच), डॉ. गणेश ढवळे, भीमराव कुटे (जिल्हाध्यक्ष, बामसेफ), प्रवीण आनेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS