अकोले: तालुक्यातील आदिवासी व डोंगराळ भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांच्या नुक

अकोले: तालुक्यातील आदिवासी व डोंगराळ भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत अकोले तालुक्याच्या वतीने तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जुलै महिन्यापासून तालुक्यात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या उशिरामुळे भात व इतर पिकांची लागवड विलंबाने झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली; मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भात पिके पाण्याखाली गेली असून, शेतीचे बांध वाहून गेले आहेत. काही ठिकाणी शेतीच नष्ट झाली आहे. हरिश्चंद्रगड, पाचनई, साम्रद, घाटघर, रतनवाडी, फोफसंडी, पांजरे, उडदावणे, वारंघुशी, तिरडा, पाचपट्टा, बिताका, कुमशेत आदी भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा ग्राहक पंचायतने केला आहे.
याशिवाय, अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे, घरांचे नुकसान होणे तसेच जनावरे दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे तातडीने पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, सयाजी आस्वले, दत्तात्रय मुठे, मोहन मुंढे, सुरेश गभाले, अशोक उघडे, महादू उघडे, लक्ष्मण उघडे, माधवराव तिटमे, रामदास पवार, गणपत थिगळे, ज्ञानेश्वर पुंडे, प्रदीप हासे, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


COMMENTS