नाशिक: नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी

नाशिक: नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
गोदाघाटावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पूरपरिस्थिती गंभीर होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गोदाघाट परिसरातील टपऱ्या आणि दुकाने तातडीने सुरक्षित स्थळी हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; विसर्ग वाढवला
नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून ३,१६५ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून पाऊस असाच सुरू राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे.
इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे:
- पालखेड धरण: १०,३३२ क्यूसेक
- नांदूर मध्यमेश्वर धरण (जायकवाडीच्या दिशेने): १३,४०७ क्यूसेक
- दारणा धरण: २,६४८ क्यूसेक
याशिवाय कडवा, भावली आणि पुनेगाव धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS