कोपरगाव: विद्यार्थी जीवनात नेहमी आदरार्थी व शिस्तबद्ध वर्तन ठेवले पाहिजे. जीवनातील ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी

कोपरगाव: विद्यार्थी जीवनात नेहमी आदरार्थी व शिस्तबद्ध वर्तन ठेवले पाहिजे. जीवनातील ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी आणि व्यसनांपासून सदैव दूर राहावे. प्रशिक्षणामुळे संयम, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित होतो, तसेच विविध भरती प्रक्रियेचे स्वरूप समजून घेण्यास मदत होते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत आणि पुढील पद प्राप्त करण्यासाठी ध्येयवादी वृत्तीने वाटचाल करावी, असे प्रतिपादन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी केले.
श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. संदीप वर्पे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संदीप वर्पे म्हणाले, “महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचे स्वप्न आज साकार होत आहे. समाजात पोलिसांविषयी आदरयुक्त भीतीची भावना असते. पोलिसांचे कर्तव्य, शिस्त आणि जबाबदारी यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घ्यावा. रयत शिक्षण संस्थेतील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करता यावे आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना रोजगाराची संधी मिळावी, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांना दिशा देऊन ती साकार करण्याच्या उद्देशाने ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS