पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर क

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले आहे. या खटल्यातील अंतिम शिक्षेबाबतचा निर्णय २९ जून रोजी जाहीर केला जाणार असून, राज्यभराचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहे. सरकारी पक्षाने न्यायालयात आरोपीला मृत्युदंड देण्याची ठाम मागणी केली आहे. हा गुन्हा अत्यंत दुर्मिळ, अमानुष आणि समाजमन सुन्न करणारा असल्याचे प्रतिपादन सरकारी पक्षाने केले. न्यायालयानेही या कृत्याची गांभीर्य अधोरेखित करत हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले.
विशेष सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना आरोपीच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचा मुद्दा मांडला. समाजात कायद्याबद्दल विश्वास कायम राहण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोरवात कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अहवालातील निष्कर्ष, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील पुरावे यांच्या आधारे आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयासमोर स्पष्ट केले. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायासनासमोर दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. दोष सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला स्वतःच्या कृत्याचा विचार करण्यास सांगत त्याची भूमिका जाणून घेतली, मात्र आरोपीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न कायम ठेवला.
आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी
नसरापूर या संवेदनशील प्रकरणात तपास यंत्रणांनी अल्पवधीत दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयातही सुनावणी वेगाने पार पडली. आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व कलमांमधील गुन्हे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यापैकी काही गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद असून, अन्य गुन्ह्यांमध्ये जन्मठेप तसेच दीर्घकालीन कारावासाची शिक्षाही शक्य आहे. दोष सिद्ध झाल्यानंतर सरकारी पक्षाने कठोर शिक्षेची मागणी केली. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना आरोपीचे वय आणि मानसिक स्थिती यांचा आधार घेत सौम्य शिक्षेची विनंती केली. आरोपी सुमारे ६५ वर्षांचा असून तो या घटनेमुळे मानसिक धक्क्यात असल्याचा दावा त्यांनी न्यायालयासमोर मांडला. एवढ्या वयात इतका क्रूर गुन्हा करण्याची शक्यता विचारात घ्यावी आणि जन्मठेप हीच योग्य शिक्षा ठरेल, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. अंतिम शिक्षा ठरवताना न्यायालय गुन्ह्याचे स्वरूप, परिस्थिती आणि कायदेशीर निकषांचा विचार करणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अल्पवधीत पूर्ण केला होता.

COMMENTS