बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यां

बीड : कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केला आहे. या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ शेतकर्यांच्या पदरात पडणार नसल्याने सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राजेंद्र आमटे म्हणाले, सरकारने ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टीएमसी, ऑपरेशन आप, ऑपरेशन एनसीपी अशी अनेक राजकीय ऑपरेशन्स राबवली; मात्र शेतकर्यांसाठी ‘ऑपरेशन कर्जमाफी’ राबविण्याची गरज आहे. खासदार फोडण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मग शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी पैसे का नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्ह्यातील बर्हाणपूर येथे सरकारच्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी शेतकर्यांमध्ये सरकारच्या कर्जमाफी धोरणाविरोधात जनजागृती करण्यात आली. शेतकरी हक्क मोर्चाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन फसव्या कर्जमाफीविरोधात जागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
अतिवृष्टी नुकसानानंतरही पीकविमा मिळेना
बीड जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असतानाही पीकविमा मिळत नसल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाने केला आहे. शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचा प्रलंबित पीकविमा तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजेंद्र आमटे यांच्यासह काशिनाथ लांडे, अतुल लांडे, मोहन लांडे, बन्सी कानडे, राम चिरके, मच्छिंद्र लांडे, नारायण लांडे, नीलेश माने, चंद्रसेन क्षीरसागर, सुरेश लांडे, दादासाहेब लांडे, गोरख शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS