बीड : माणसाने नको ती व्यसने करण्यापेक्षा भजनाचे व्यसन करावे. एकदा का भजनाचे व्यसन माणसाला लागले की, त्या माणसाचा परमार्थ सुखाचा होतो. भगवंत भक्ती

बीड : माणसाने नको ती व्यसने करण्यापेक्षा भजनाचे व्यसन करावे. एकदा का भजनाचे व्यसन माणसाला लागले की, त्या माणसाचा परमार्थ सुखाचा होतो. भगवंत भक्तीतूनच जीवनाचा उद्धार होतो, हा विचार सर्व संतांनी आपल्या अभंगांतून समाजासमोर मांडला आहे. परंतु, माणूस भौतिक साधनांमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि खर्या सुखापासून अलिप्त राहतो. म्हणूनच आजच्या समाजाला संत विचारांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम कीर्तनकार अक्षय महाराज पिंगळे यांनी केले.
येथील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी वारीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शुक्रवारी (दि. 19) कीर्तनकार अक्षय महाराज पिंगळे यांचे सुश्राव्य सांप्रदायिक कीर्तन संपन्न झाले. कीर्तनाच्या प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी पिंगळे महाराजांचा यथोचित सत्कार केला. या कीर्तन सेवेसाठी अक्षय महाराज पिंगळे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ’जाय जाय तूं पंढरी। होय होय वारकरी॥ सांडोनिया वाळवंट। काय इच्छिसी वैकुंठ॥ या अभंगावर रसाळ निरूपण केले. ते म्हणाले की, ज्यांना साधू-संतांचे विचार समजू शकले नाहीत, त्यांना परमार्थ कधीच समजणार नाही. माणसाने वेळेत वेळ काढून परमार्थ केला पाहिजे. संतांचे विचार जीवन कशासाठी जगायचे, याची खरी प्रेरणा देतात. त्यामुळे प्रत्येकाने साधू-संतांचा आदर-सन्मान केला पाहिजे. पुढे बोलताना महाराज म्हणाले की, प्रत्येकाने जीवनात कधीतरी तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. पूर्ण ज्ञानेश्वरी वाचणे शक्य झाले नाही, तरी त्यातील किमान एक ओवी वाचून ती आत्मसात करावी. एका ओळीचे जरी अनुकरण करता आले, तरी माणसाला जीवनाचे खरे मर्म समजू शकेल. भजनाची सवय एकदा लागली की ती सुटत नाही, म्हणूनच जीवनात चांगल्या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.या कीर्तन सोहळ्याला बालटाळकरी, वारकरी तसेच गायक-वादकांनी सुरेल साथसंगत केली. यावेळी बीड शहर व परिसरातील विठ्ठलभक्त आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS