Homeताज्या बातम्या

कोलांट्या उड्यांचे राजकारण अन् कृष्णा आष्टीकरांवर पराभवाचे सावट; ‘ऑपरेशन टायगर’मुळे नांदेड विधानपरिषदेत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या राजकीय भूमिकेमुळे महाविकास आघाडीत

“सदृश आणि अदृश्य शक्ती आमच्यासोबत”; नगरसेवक गायब असल्याच्या चर्चेवर खासदार अशोकराव चव्हाणांचे सूचक वक्तव्य
धोंडे जेवणात काँग्रेसच्या अंतर्गत अस्वस्थतेला वाट; संघटनात्मक फेरबदलांवर निष्ठावंतांचा सवाल
भगवान गायकवाड यांना ‘युवा आंबेडकरवादी समाजभूषण पुरस्कार’ प्रदान; नांदेड येथील साहित्य संमेलनात गौरव
Nanded: Krishna Patil VIDEO; Always Thackeray Shiv Sainik Amidst Rebellion  Buzz

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकरण विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या राजकीय भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अलीकडील राजकीय कोलांट्या उड्यांचा फटका थेट त्यांचे पुत्र आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मतदानाच्या पूर्वसंध्येला कृष्णा आष्टीकर यांच्या धक्कादायक पराभवाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ६ खासदारांच्या स्वतंत्र गटात उडी घेतल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिल्यानंतर मराठवाड्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मते ठाकरे यांच्या नावावर घ्यायची आणि सत्तेच्या समीकरणांसाठी वेगळा मार्ग स्वीकारायचा, अशा शब्दांत कार्यकर्तेच संताप व्यक्त करत आहेत.

नांदेड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वतःचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांचा अर्ज मागे घेऊन कृष्णा पाटील आष्टीकर यांना पाठिंबा दिला होता. मात्र, नागेश पाटील आष्टीकर यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात एका बड्या हॉटेलमध्ये झालेल्या कथित बैठकीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीतच विधानपरिषद निवडणुकीची रणनीती आखण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे महाविकास आघाडीतील संशय आणखी वाढला आहे.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीची मते विभागली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व गोंधळाचा थेट फायदा भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या राजकीय हालचालींनी शिवसेनेतील निष्ठा, विचारधारा आणि नैतिकतेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे.

COMMENTS