नांदेड : खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी थकीत पीक विमा नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ

नांदेड : खरीप हंगामातील पीक नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी थकीत पीक विमा नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम तात्काळ वितरित करावी, अशी मागणी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
सन 2025-26 च्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असली तरी अनेक शेतकर्यांना अद्याप उर्वरित रक्कम मिळालेली नाही. यासंदर्भात कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आ. बोंढारकर यांनी नमूद केले आहे की, सध्या आगामी हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत थकीत विमा रक्कम वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य शासनाने मंजूर केलेली उर्वरित नुकसानभरपाई विमा कंपनीमार्फत तातडीने शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आ. आनंदराव बोंढारकर यांनी या प्रकरणातही शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शेतकर्यांना त्यांचा हक्काचा विमा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS