मधुकर बाटकरांचे ३ दिवसांपासून आमरण उपोषण! बुलढाणा जिल्ह्यातून एका वृद्ध शेतकऱ्याच्या हक्काच्या लढाईची अत्यंत वेदनादायी आणि खळबळजनक बातमी समोर
मधुकर बाटकरांचे ३ दिवसांपासून आमरण उपोषण!
बुलढाणा जिल्ह्यातून एका वृद्ध शेतकऱ्याच्या हक्काच्या लढाईची अत्यंत वेदनादायी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तब्बल तीन पिढ्यांपासून कसत असलेली जमीन काही भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने बळकावल्याचा आरोप करत, संग्रामपूर तालुक्यातील एक वृद्ध शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून बुलढाण्यात आमरण उपोषणाला बसले आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील मोमीनाबाद येथील मधुकर तुकाराम बाटकर यांच्या ताब्यातील ही जमीन आहे. १९६० पासून म्हणजे त्यांच्या आजोबांच्या, वडिलांच्या काळापासून ते स्वतः ही शेती कसत आहेत. २०१४ च्या शासन निर्णयानुसार, ‘जी जमीन कसेल ती त्याच्याच नावावर’ व्हायला हवी होती. मात्र, काही लोकांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांशी संगनमत करून चक्क बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली.
आपली हक्काची जमीन परत मिळवण्यासाठी मधुकर बाटकर यांनी अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले. अनेक तक्रारी केल्या, पण पैशांच्या लालसेपोटी महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारींकडे कानाडोळा केला आणि त्यांची जमीन दुसऱ्याच्याच नावावर राहू दिली. अखेर प्रशासनाच्या या अन्यायाविरोधात त्यांनी बुलढाण्यात आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून बाटकर यांची प्रकृती खालावत चालली आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, तीन दिवस उलटूनही अजून एकाही वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट देऊन या वृद्ध शेतकऱ्याची साधी विचारपूसही केलेली नाही.
६० वर्षांपासून कसत असलेल्या जमिनीसाठी एका शेतकऱ्याला वृद्धत्वात उपोषणाला बसावे लागणे, हे व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. आता तरी जिल्हा प्रशासन जागे होणार का? आणि मधुकर बाटकर यांना न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS