कोपरगाव : “पाच वर्षे सत्ता असताना जिरायती भागातील नागरिकांची कधीही आठवण झाली नाही. उलट आमच्या हक्काच्या पाण्यावर डोळा ठेवून राजकीय स्वार्थ साधण्य

कोपरगाव : “पाच वर्षे सत्ता असताना जिरायती भागातील नागरिकांची कधीही आठवण झाली नाही. उलट आमच्या हक्काच्या पाण्यावर डोळा ठेवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच त्या काळात नागरिकांनी विरोध केला होता. आज जिरायती भागात निळवंडे धरणाचे पाणी पोहोचले, ते केवळ आमदार आशुतोष काळे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच,” असा दावा अंजनापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
गव्हाणे यांनी म्हटले आहे की, निळवंडे कालव्याचे पाणी उपलब्ध होण्यापूर्वी माजी आमदार अशोकराव काळे आणि आमदार आशुतोष काळे यांनी आर्थिक भार सहन करत उजनी उपसा जलसिंचन योजना सुरू ठेवली. त्यामुळे जिरायती गावांतील नागरिकांना दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात बसल्या. मात्र, २०१४ ते २०१९ या कालावधीत सत्तेत असलेल्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले. उलट निळवंडेच्या पाण्यावरच डोळा ठेवला. त्यामुळेच २०१९ मध्ये जिरायती भागातील नागरिकांनी आशुतोष काळे यांना निवडून दिले, असे त्यांनी नमूद केले.
“आमदार आशुतोष काळे यांनी उजनी उपसा जलसिंचन योजना सुरू ठेवत निळवंडेचे पाणी गावागावांत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. वेळप्रसंगी कालव्याच्या भरावावर उन्हात ठाण मांडून बसत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बंधारे, पाझर तलाव आणि साठवण तलाव भरून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर आणि बहादराबाद या गावांतील तीन पिढ्यांची प्रतीक्षा संपली,” असेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.
“प्रत्यक्ष योगदान नसताना श्रेय घेण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. नागरिक सर्व काही जाणून आहेत,” असा टोला त्यांनी शेवटी लगावला.

COMMENTS