राहाता : मृत्यूनंतरही समाजोपयोगी ठरण्याची भावना जपणारी माणसेच खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देतात. राहाता येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा राहात

राहाता : मृत्यूनंतरही समाजोपयोगी ठरण्याची भावना जपणारी माणसेच खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देतात. राहाता येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा राहाता तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहसचिव मिलिंद गांधी यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या निर्णयातून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
राहाता येथील सुरेश बाळकृष्ण गांधी यांचे नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा आणि मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे त्यांचे सुपुत्र मिलिंद गांधी यांनी वडिलांच्या निधनानंतर पारंपरिक अंत्यसंस्कार न करता देहदान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
अंत्यविधीच्या वेळी कुटुंबीय भावनिक अवस्थेत असतात. अशा वेळी जुन्या रुढी-परंपरा आणि कर्मकांडांना बाजूला ठेवत गांधी कुटुंबाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. निधनानंतर तत्काळ लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसशी संपर्क साधून सुरेश गांधी यांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी सुपूर्द करण्यात आले. या निर्णयामुळे देहदानाविषयी समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचत आहे.
“एखाद्याला मदतीचा हात देणे जसे नवजीवन देणारे ठरते, तसेच मृत्यूनंतर केलेले देहदान किंवा अवयवदानही अनेकांसाठी जीवनदायी ठरू शकते. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृतदेहांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे समाजाने या विषयाबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे.” — प्रा. अनिल पावटे

COMMENTS