मुंबई : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ‘शिवशाही’ बसला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत ‘शिवशाही’ बसला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने बसमधील सुमारे 15 प्रवासी वेळेवर बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बस ठाणेहून पालघरमार्गे बोईसरकडे रवाना झाली होती. स्थानकाजवळील सेटीस ब्रिज परिसरात बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि वाहन अचानक थांबले. चालक परिस्थितीची पाहणी करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच या धुराचे रूपांतर आगीत झाले आणि इंजिनकडून पेट घेतलेली आग झपाट्याने संपूर्ण बसमध्ये पसरली. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने बसमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. चालक आणि वाहक यांनीही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले. मात्र आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केल्याने बसमधील सर्व साहित्य जळून नष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक नागरिकांनीही मदतीचा हात पुढे केला. मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, काही वेळातच बस पूर्णतः जळून केवळ सांगाडा उरल्याचे दृश्य दिसून आले. दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, इंजिनमध्ये निर्माण झालेला बिघाड, अतिउष्णता किंवा विद्युत शॉर्टसर्किट यांपैकी कोणत्याही कारणामुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे वाहनांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल याबाबत अधिक काटेकोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS