देवळाली प्रवरा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून तब्बल 3 लाख 33 हजार 5

देवळाली प्रवरा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून तब्बल 3 लाख 33 हजार 545 मतदार आपला कौल देणार आहेत. मात्र मतदानाआधीच राजकीय वातावरण अक्षरशः तापले असून, प्रत्येक हालचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत भाजपाने पूर्ण ताकद झोकून दिली आहे. दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी देत सहानुभूतीचा मुद्दा पुढे केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे यांना मैदानात उतरवून जोरदार लढत उभी केली आहे.पण या सर्व लढतीपेक्षा जास्त चर्चेत आहे एकच नाव प्राजक्त तनपुरे! ‘कमळाला प्राजक्तची साथ पाहिजे? परंतु माजी आमदार तनपुरे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राजक्त तनपुरे यांना सुरुवातीला निवडणुकीपासून दूर ठेवण्यात भाजपाला यश आल्याची चर्चा असली, तरी आता ते कोणाच्या बाजूने उभे राहणार, हा खरा ‘गेमचेंजर’ प्रश्न ठरत आहे. विशेष म्हणजे, ते सध्या मतदारसंघात सक्रियही दिसत नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, अपक्ष रावसाहेब खेवरे यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात असल्याने लढत बहुकोनी झाली आहे. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे वंचितची ताकदही वाढण्याची चिन्हे आहेत.
भाजपाने मात्र तनपुरेंना आपल्या गोटात आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संवाद घडवून आणल्याचे बोलले जाते. इतकेच नव्हे, “प्राजक्त तनपुरे आमच्यासोबत आले तर आनंदच होईल,” असे खुले आमंत्रणही देण्यात आले आहे. प्रा. राम शिंदे यांनीही उघड आवाहन करून दबाव वाढवला आहे.
मात्र, तनपुरे अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे दिसते. मामा जयंत पाटील यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.आता सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत 20 एप्रिलकडे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरीतील जाहीर सभा राजकीय समीकरणे बदलणार का? त्या व्यासपीठावर तनपुरे दिसणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अक्षय कर्डीले यांना उघड पाठिंबा देणार का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरितच आहेत… पण एक गोष्ट निश्चित राहुरीत सध्या उन्हापेक्षा राजकारण जास्त तापलंय! आणि आता सर्वात मोठा प्रश्न एकच “कमळाला प्राजक्तचा सहवास मिळणार का?” यासाठी आगामी काही दिवसांची वाट बघावी लागणार हे नक्की.
मामांशी चर्चा;मग निर्णय?
माजी मंत्री तनपुरे अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे दिसते. मामा जयंत पाटील यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. आता सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत 20 एप्रिलकडे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरीतील जाहीर सभा राजकीय समीकरणे बदलणार का? त्या व्यासपीठावर तनपुरे दिसणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अक्षय कर्डीले यांना उघड पाठिंबा देणार का?यासाठी आगामी काही दिवसांची वाट बघावी लागणार हे नक्की.

COMMENTS