किनवट : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त किनवट शहरात एक ऐतिहासिक कार्य पार पडले. युवा उ

किनवट : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त किनवट शहरात एक ऐतिहासिक कार्य पार पडले. युवा उद्योजक आशिष शेळके यांच्या वतीने शहराच्या मुख्य चौकात ’विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ या नावाचा भव्य डिजिटल फलक बसवण्यात आला आहे. 14 एप्रिल रोजी जयंती समितीच्या उपस्थितीत आशिष शेळके यांच्या हस्ते या फलकाचे उत्साहात अनावरण करण्यात आले.
किनवटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला अनेक वर्षांपासून ’आंबेडकर चौक’ म्हणून ओळखले जाते. मात्र, या ठिकाणी अधिकृत नावाचा कोणताही फलक किंवा पाटी उपलब्ध नव्हती. ही बाब जयंती समितीचे अध्यक्ष आकाश आळणे, सचिव प्रतिकेश ओंकार आणि सहकार्यांनी आशिष शेळके यांच्या निदर्शनास आणून दिली. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून शेळके यांनी तत्काळ स्वखर्चाने हा डिजिटल बोर्ड तयार करून देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे, शब्द दिल्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या विक्रमी वेळेत त्यांनी हा आकर्षक डिजिटल बोर्ड तयार करून घेतला आणि जयंतीचे औचित्य साधून तो चौकात लावला. आशिष शेळके यांनी दिलेले हे ’धम्मदान’ शहरासाठी ऐतिहासिक ठरले आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना कृतीतून सिद्ध केल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. या डिजिटल फलकामुळे आता या परिसराला एक वेगळी ओळख प्राप्त झाली असून, नागरिक आशिष शेळके यांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आहेत.

COMMENTS