नवी दिल्ली : महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. राजधान

नवी दिल्ली : महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. राजधानीतील संसद भवन परिसरातील प्रेरणा स्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी पुष्पचक्र अर्पण करून महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन केले.
या वेळी राज्यसभा उपसभापती हरिवंश, केंद्रीय आरोग्य मंत्री जगतर प्रकाश नड्डा, सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तसेच कायदा व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक विद्यमान व माजी खासदारांनीही उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार, प्रेरणा स्थळी आयोजित या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण यावेळी सर्वांनी कृतज्ञतेने व्यक्त केली. महात्मा जोतिराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील प्रखर समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जातिभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. शिक्षणाचा प्रसार, विशेषतः महिलांसाठी आणि वंचित समाजासाठी शिक्षण उपलब्ध करून देणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. 1873 साली त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजातील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावाविरुद्ध व्यापक जनजागृती केली. शेतकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. शेतीत वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शेतकर्यांचे सशक्तीकरण यावर त्यांनी भर दिला. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय योगदान दिले. गरीब आणि वंचितांच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल 1888 साली त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी बहाल करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘भारताचे बुकर टी. वॉशिंग्टन’ असेही संबोधले गेले. संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळी महात्मा फुले यांची उभारलेली भव्य कांस्य मूर्ती त्यांच्या विचारांचे प्रतीक मानली जाते. शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी साकारलेली ही सुमारे बारा फूट उंच मूर्ती माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते 3 डिसेंबर 2003 रोजी अनावरण करण्यात आली होती. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांच्या विचारांचे पुनःस्मरण होत असून समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित होत आहे.

COMMENTS