पुन्हा राम मंदिर!

Homeसंपादकीय

पुन्हा राम मंदिर!

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्याच आठवडयात उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या पाच राज्यांपैकी चार राज्ये भाजपच्या ताब्यात आहे.

श्रेयवादामुळे तोंडघशी
भोगी असणारा योगी कसा !
कडवट शिवसैनिक हरपला

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्याच आठवडयात उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यांतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या पाच राज्यांपैकी चार राज्ये भाजपच्या ताब्यात आहे. पंजाब फक्त काँग्रेसच्या ताब्यात आहे. कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश आणि देशाचा विकासदर या मुद्यावरून भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. 

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला सर्वाधिक महत्त्व आहे. त्याचे कारण या राज्यांत लोकसभेच्या ऐेंशी जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतले जाते. उत्तर प्रदेशात भाजपला गेल्या चार वर्षांपूर्वी मिळालेल्या यशानंतर योगी यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले ते पाहता आता उत्तर प्रदेशात त्यांच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता नाही. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात त्यांना अपयश आले. त्यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी आवाज उठविला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पक्षातील या नाराजीची दखल घ्यावी लागली. उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या बी. एल. संतोष यांनी नेत्यांशी व्यक्तिगत चर्चा केली. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यांशीही चर्चा केली. भारतीय जनता पक्षाला आपल्याच पक्षाच्या कारभाराविरोधात असलेली नाराजी दूर करण्यासाठी हालचाली कराव्या लागल्या, यातच सारे आले. योगी यांना हात न लावता मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्याची शक्यता दिसते. गंगेत दररोज वाहून येणारे मृतदेह उत्तर प्रदेश सरकारच्या कारभाराची लक्तरे गंगेच्या वेशीवर टांगत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविण्यात भाजप कधीही यशस्वी होत नाही. त्याला कायम भावनेचाच आधार घ्यावा लागतो. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोदी, योगी, मौर्य यांच्यासह बहुतांश नेत्यांच्या मतदारसंघात भाजपला चांगलाच फटका बसला. याचा अर्थ भाजपच्या विरोधात जनमत चालले आहे. त्याची दखल भाजप आणि संघालाही घ्यावी लागली. संघ व भाजपच्या नेत्यांची दोनदा बैठक झाली. त्यात भाजपची परिस्थिती सुधारण्यासाठी काय व्यूहनीती करण्यावर एकमत झाले. भाजपची प्रतिमा सुधारायची असेल, तर संघटनात्मक व सरकार अशा दोन्हींमध्ये बदल करायचे ठरविले आहे. शिवाय विकासाचा मुद्दा जिंकण्यासाठी कितपत उपयोग पडतो, याबाबत भाजप आणि संघाच्या नेत्यांनाच साशंकता आहे. पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला श्रीराम पावला नाही; परंतु ममता बॅनर्जी यांना दुर्गा पावली. श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम मंदिर बांधणीचा पेच सोडविला. अयोध्येत आता आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य धार्मिक पर्यटनाच्या सुविधा केल्या जात आहेत. पुन्हा राम मंदिराचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेशी भावनिकदृष्ट्या संबंधित मुद्द्यांचा सामना करावा लागणार आहे. पक्षाच्या विश्‍वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, राम मंदिर केंद्रस्थानी ठेवून भाजप संपूर्ण प्रचाराचा आराखडा तयार करणार आहे. राम मंदिराच्या मुद्दयावर लोकांना सहज बांधून ठेवता येतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्‍वास आहे. ’राष्ट्रीयत्वाशी संबंधित विषय केंद्रस्थानी ठेवून भाजप उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरे जाईल. राम मंदिर प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचे पक्षाचे धोरण आहे. राम मंदिर ही भाजपची सर्वांत मोठी उपलब्धी आहे, असे भाजपचे माजी अध्यक्ष सांगतात. बंगालच्या निवडणुकीत ज्या प्रकारे बंगाली अस्मितेचा मुद्दा गाजला. ममतांना निवडणूक जिंकण्यात बंगाली अस्मितेची खूप मदत झाली. लोकांच्या भावनांशी संबंधित असे मुद्दे नेहमीच प्रभावी असतात. हे लक्षात घेऊन येत्या काही दिवसांत कार्यककर्त्यांना तळागाळात जाऊन अयोध्याच्या नावावर मोहीम राबविण्यास सांगण्यात येणार आहे. निवडणूक प्रचार दोन टप्प्यांत ठेवण्यात येणार आहे. सध्याच्या काळात पक्षाने साथीच्या रोगासंदर्भात राबविल्या जाणार्‍या जनकल्याणकारी कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे; परंतु निवडणुका जवळ येताच भाजपचे हिंदुत्व प्रतिमेशी संबंधित असलेल्या मुद्द्यांकडे जनतेचे लक्ष वळविले जाईल. अशा प्रकारे भाजपचे नियोजन असेल. उत्तर प्रदेश विधानसभेचा निवडणूक प्रचार दोन टप्प्यात विभागला जाईल. पहिल्या टप्प्यात जनतेशी संबंधित विषयांवर व सरकारच्या चांगल्या कामांवर लक्ष केंद्रित केले जाईल. दुसर्‍या टप्प्यात राम मंदिराला प्रचाराच्या केंद्रस्थानी आणले जाईल. भाजपने राम मंदिर प्रश्‍नी कशी महत्त्वाची भूमिका बजावली, हे जनतेपुढे पुन्हा आणले जाईल. भावनिकरित्या जोडलेल्या मुद्द्यांकडे लोकांचे लक्ष हळूहळू वळवले जाईल. हिंदुत्व प्रतिमेचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला जाईल. पक्षाचे नेते सांगतात, की राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष आणि राधा मोहन सिंग यांनीही बैठकीत कार्यकर्त्यांचा तळागाळात संपर्क कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली होती. यावर अधिक लक्ष देण्याच्या सूचना पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी केल्या होत्या. कमकुवत ग्राउंड कनेक्टिव्हिटीमुळे विरोधी पक्षांना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळत आहे, हे दोघांनीही मान्य केले होते. त्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल असंतोष वाढत आहे. कोरोना कालावधीतही राम मंदिराच्या बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. अनेक मंत्री, आमदारांनी थेट मुख्यमंत्री योगी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी दूर करण्यावर भाजप आणि संघाचा भर आहे. तसेच विकासाच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येणार नाही, याची खात्री नाही. भाजपला समाजवादी पक्षाचेच मोठे आव्हान आहे. ते मोडीत काढायचे असेल, तर जनतेच्या प्रश्‍नांवर नव्हे, तर ’नॉन इश्यू’वर निवडणूक लढविण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, हे भाजप आणि संघाला पटले आहे.

COMMENTS