कर्जतच्या तहसीलदारांनी उचलले ठोस पाऊल; लेखी तक्रारी करण्याचे आवाहन

Homeअहमदनगर

कर्जतच्या तहसीलदारांनी उचलले ठोस पाऊल; लेखी तक्रारी करण्याचे आवाहन

कर्जत : प्रतिनिधी सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. मात्र कर्जत तालुक्यात काही त्रयस्त व्यक्ती अथवा एजंट या

शेतक-यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा : कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील
राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून
स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन

कर्जत : प्रतिनिधी

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. मात्र कर्जत तालुक्यात काही त्रयस्त व्यक्ती अथवा एजंट यांच्याकडून लाभार्थ्यांना प्रकरण मंजुरीचे आमिष दाखवले जात असून त्यांच्याकडून पैशाची लुट केल्याचे निदर्शनास येत आहे. जर कोणी त्रयस्त व्यक्ती आर्थिक लुट करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींबाबत तहसील कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करावी.  संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिला आहे.

आगळे यांनी म्हटले आहे, सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत  श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनाअंतर्गत वृध्‍द, विधवा, अपंग, निराधार, परित्यक्ता, अनाथ व दुर्धर आजाराने ग्रस्‍त असलेल्‍या लाभार्थ्‍यांना लाभ दिला जातो.

या योजनेअंतर्गत प्राप्‍त अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्य्यक्षतेखाली वेळोवेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक घेतली जाते. बैठकीत प्राप्त अर्जाची छाननी करून कागदपत्रांची तपासणी करून शासन निर्णयातील तरतुदीनुसार नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाते.

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थींना शासनामार्फत आर्थिक लाभ दिला जातो. यासाठी शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक ३३.६० रुपये एवढी फी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक पुरावे जोडून लाभार्थ्यांनी अर्ज आपले सरकार केंद्राकडे जमा करावा. जर आपले सरकार सेवा केंद्र चालक शासकीय फी व्यतिरिक्त अवास्तव रक्कम आकारत असतील तर त्यांच्याबाबत रीतसर तक्रार कार्यालयाकडे करावी. 

लाभ चालू असलेल्या लाभार्थ्यांनी किंवा ज्यांना लाभ सुरु करावयाचा आहे अशा लाभार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव त्रयस्त व्यक्तींनी दिलेल्या अमिषाला बळी पडू नये. आपल्या समस्यांबाबत तसेच कागदपत्रांबाबत स्वत: कार्यालयात येऊन माहिती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहनही तहसीलदार आगळे यांनी केले आहे.

COMMENTS