बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम समाजामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर गोरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणत्

बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम समाजामध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर गोरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणत्याही प्रकारे जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख युनूस यांनी केली आहे.
शेख युनूस म्हणाले की, बीड जिल्हा हा स्व. केशरबाई काकू क्षीरसागर आणि स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचे काम झाले. तसेच जयदत्त क्षीरसागर यांनीही सर्व जाती-धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका घेतली असून कधीही समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले नाही. डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांनी गोरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मुस्लिम समाज देखील गायींचा सन्मान करतो आणि गोरक्षणाच्या विरोधात नाही. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असून गोमातेला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. बीड जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम समाज आजही गुण्यागोविंदाने राहत आहे. मराठा समाजाच्या विविध आंदोलनांमध्ये मुस्लिम समाजानेही वेळोवेळी सहकार्य केले आहे. मराठा समाजाला मोठा भाऊ मानून मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे शेख युनूस यांनी सांगितले. क्षीरसागर घराण्याने आतापर्यंत सामाजिक एकोपा कायम ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत, अशी विनंती त्यांनी डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांना केली. गोमातेला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करावी, या मागणीसाठी मुस्लिम समाजही सहकार्य करेल, असेही शेख युनूस यांनी स्पष्ट केले.

COMMENTS