नागपूर / प्रतिनिधी : मोबाईल आणि मायक्रोफोन हातात घेऊन स्वतःला ‘रिपोर्टर’ म्हणवून घेणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य
नागपूर / प्रतिनिधी : मोबाईल आणि मायक्रोफोन हातात घेऊन स्वतःला ‘रिपोर्टर’ म्हणवून घेणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असले, तरी ते बेजबाबदार पत्रकारिता, दडपशाही किंवा समाजात तणाव निर्माण करणार्या वर्तनाचे संरक्षण ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयाने माध्यम क्षेत्रासाठी उत्तरदायित्व आणि नैतिक मानके सुनिश्चित करणारी नियामक चौकट उभारण्याची गरजही अधोरेखित केली.
न्यायमूर्ती गिरीश कथपालिया यांनी अबिद अली आणि फुरकान यांच्या जामीन अर्जांवर निर्णय देताना ही निरीक्षणे नोंदवली. या दोघांविरुध्द सीमापुरी पोलीस ठाण्यात सन 2025 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. अनधिकृत बांधकामाचे चित्रीकरण करत असल्याचा दावा करणार्या दोन ‘यूट्यूब रिपोर्टर्स’वर जमावाने हल्ला केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
सुनावणीदरम्यान तपास अधिकार्याने न्यायालयासमोर सादर केलेली माहिती आणि व्हिडीओतील दृश्यांमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. आरोपींची ओळख, त्यांची भूमिका आणि व्हिडीओतील उपस्थिती याबाबत तपास यंत्रणेची भूमिका सुसंगत नसल्याची नोंद करत न्यायालयाने पोलिसांच्या ढिसाळ तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जवळपास वर्षभर आरोपी तुरुंगात असूनही खटला सुरू झालेला नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कोणतीही व्यक्ती मोबाईल व मायक्रोफोन घेऊन स्वतःला ‘रिपोर्टर’ घोषित करते. अनेकदा अशा व्यक्ती नागरिकांवर तत्काळ प्रतिक्रिया देण्याचा दबाव आणतात. उत्तर न दिल्यास दिशाभूल करणारे कथन करतात किंवा सनसनाटी आणि अप्रमाणित माहिती प्रसारित करतात. अशा प्रकारामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवताना व्यावसायिक उत्तरदायित्व, नैतिकता आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी कायदेशीर चौकट उभारण्याची वेळ आल्याचे न्यायालयाने नमूद केले.

COMMENTS