Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकार्‍यांवर कारवाई होईल का ?

शिक्षकांना झटपट निलंबित करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी गप्प कसे? डॉ. अशोक सोनवणे/अहमदनगर : सर्व क्षेत्रात शिक्षण क्षेत्र पवित्र म्हणून ओळखले ज

आपत्तीत मदत करणारे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ः प्रा. बारहाते
ओबीसी आरक्षण रद्द… बारा बलुतेदारांना फास.. l Lok News24
कोळपेवाडी महेश्‍वर यात्रा महोत्सव जल्लोषात

शिक्षकांना झटपट निलंबित करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी गप्प कसे?

डॉ. अशोक सोनवणे/अहमदनगर : सर्व क्षेत्रात शिक्षण क्षेत्र पवित्र म्हणून ओळखले जाते. कारण या क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असते. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतो, मात्र अहमदनगरच्या शिक्षण क्षेत्राला वाळवी लागली असून, ही वाळवी या शिक्षण क्षेत्राला पोखरतांना दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदेतील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि सहायक कक्ष अधिकारी संभाजी भदगले या दोघांवर मागील आठवड्यात भ्रष्टाचाराचा नव्हे तर, विनयभंग आणि अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे ज्ञानमंदिराचे दरवाजे किलकिले झाल्याचे दिसून येत आहे.
संस्कारांच्या ज्ञानमंदीरांचे रखवालदारच बिघडले तर यातून विद्यार्थी पालकांनी कुठला आदर्श घ्यावा. वाईट कृत्य किंवा प्रशासनाच्या विरोधात बोलणार्‍या शिक्षकांच्या बाबत कर्तव्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी तातडीने निलंबनाची कारवाई करत असतील तर या जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांवर कारवाईसाठी तितकी तत्परता का दाखविली जात नाही, असा सवाल सध्या शिक्षक आणि पालकांमधून उपस्थित होत आहे.
पाथर्डी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेने 18 ऑक्टोबर 2023 रोजी निलंबित केलेले विजय तुळजाराम अकोलकर (उपाध्यापक) 08 सप्टेंबर 2023 रोजी निलंबित केलेले उमेश शिवलिंग अय्या (मुख्याध्यापक) यांचेसह जिल्हा परिषदचे भास्कर पाटील (प्राथमिक शिक्षणाधिकारी) आणि संभाजी सूर्यभान भदगले (सहाय्यक कक्ष अधिकारी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षिकेचा अकोलकर आणि अय्या यांनी निलंबनापूर्वी मानसिक छळ केला, मात्र ती तक्रार पोलिसांत नोंदविण्यास इतका उशीर का केला गेला? त्याबाबत कुणाचा दबाव होता की आणखी काही? याबाबत प्रश्‍नचिन्ह असले तरी ही बाब तपासाअंती समोर येईलच. तिच कैफीयत वरीष्ठांकडे मांडली पण कारवाई न होता त्या शिक्षिकेला तिथेही त्रास झाला आणि परिणामी गुन्हा दाखल झाला.
जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गतकाळात शिक्षकांवर धडाकेबाज निलंबनाच्या कारवाया केल्या. त्यातच अकोलकर आणि अय्याचा समावेश आहे. विजय तुळजाराम अकोलकर, उपाध्यापक तथा प्रभारी मुख्या. जि.प.प्राथ.शाळा खांडगाव, ता. पाथडीं, जि. अहमदनगर यांचे विरोधात नवनाथ विद्यालय करंजी, ता. पाथर्डी येथील शिक्षिकेने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे 15 ऑक्टोबर 2023 रोजी अधिनियम भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 354-0 व 34 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 च्या नियम 3 मधील (1) (ब) नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चा 3 भंग केलेला असल्याने, अकोलकरवर शिस्तभंग कारवाई करुन त्यानंतर अवघ्या तिनच दिवसांत अकोलकरचे निलंबन करण्यात आले.याप्रकरणी येरेकरांनी इतकी तत्परता दाखविली असेल तर भास्कर पाटील आणि संभाजी भदगलेंचे निलंबन करण्यास कुणाच्या आदेशाची वाट बघितली जात आहे. कारवाई करण्यास आळी मिळी गुपचिळी करुन पवित्र शिक्षण क्षेत्राला कलंकीत करु नये इतकेच. राजेंद्र गोविंदराव सद्गीर आणि अण्णासाहेब रामभाऊ आभाळे जि.प.प्राथ. शाळा कुंभेफळ, ता. अकोले, येथे कार्यरत असताना 23 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती अकोले संदर्भात प्रसार माध्यमाकडून आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांचेबद्दलही जिल्हा परिषद प्रशासनाने तत्परता दाखवून दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पत्रकार परिषदेला त्या शिक्षकांनी कुठलीही टिप्पणी केलेली नव्हती फक्त घोळक्यात हजर होते फोटोत आले म्हणुन त्यांचेवर कारवाई केली असल्याचे समजले.

अजूनही प्रशासकीय कारवाईचा पत्ता नाही
भास्कर पाटील सध्या नॉट रिचेबल असून संबंधित विभागाचा कार्यभार अद्यापतरी उपशिक्षणाधिकार्‍यांकडे देण्यात आलेला नाही. गुन्हा नोंदवून चार दिवस उलटले मात्र सोमवारी दुपारपर्यंत आरोपींवर कुठलीही प्रशासकीय कारवाई झालेली नसल्याची कबुली उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिवगुंडे यांनी दिली असून याबाबत कारवाई झालेले अनेक शिक्षकही विचारणा करत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांना विचारणा केली असता अद्याप तरी कुठलीही कारवाई झालेली नसून शहानिशा झाल्याशिवाय पुढील कारवाई होणार नसल्याचे सांगितले. मागील कारवाया बघितल्या आणि सद्यस्थितीच्या घटनेचे अवलोकन केले तर खिरा चोर फाशीला हिरा चोर काशीला अशी परिस्थिती जिल्हा परिषद प्रशासन विभागात दिसून येत आहे.

छळ होत असलेल्या पीडितांना संपर्क साधावा
शिक्षण विभागातील सावळा गोंधळ सुरू असून, त्यावर पांघरून घालण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. खरंतर भास्कर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात जळगाव-भुसावळपासून ते अहमदनगरपर्यंतचे केलेल्या उद्योगांचे पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच यासंदर्भात अहमदनगर शहर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिका, तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचा छळ होत असल्यास, त्यांचा मानसिक छळ होऊन निलंबनाचे प्रकार घडले असतील तर त्यांनी ती त्यांची आपबीती 9822254475 या मोबाईल क्रमाकांवर सांगावी, आम्ही त्यांचे नाव उघड न करता, त्यासंदर्भात शिक्षण विभागाला जाब विचारून आपल्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यास आम्ही बांधील आहोत.

COMMENTS