श्रीगोंदा : तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या लिंपणगाव येथील दलित वस्तीत ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेला वॉटर फिल्टर गेल्
श्रीगोंदा : तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या लिंपणगाव येथील दलित वस्तीत ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेला वॉटर फिल्टर गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत असून, शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून नागरिक वंचित राहत असल्याचा आरोप युवक नेते विजय ओहोळ यांनी केला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने दलित वस्तीतील नागरिकांना अल्प दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर उभारले होते. मात्र, केवळ विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे हे यंत्रणा प्रत्यक्षात कधीच सुरू होऊ शकली नाही. परिणामी, हा प्रकल्प केवळ देखाव्यासाठी उभारल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे विजय ओहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी माजी सरपंच अरविंद कुरुमकर यांनीही ग्रामपंचायत प्रशासनावर टीका करत सांगितले की, उन्हाची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत दलित वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. मात्र, नादुरुस्त वॉटर फिल्टरमुळे नागरिकांना बाहेरून पैसे देऊन पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत ग्रामविकास अधिकारी धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सदर वॉटर फिल्टरचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे तो कार्यान्वित होऊ शकलेला नाही. संबंधित समस्या तातडीने सोडवून दलित वस्तीत लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.”
गेल्या दशकभरापासून बंद पडलेल्या या वॉटर फिल्टरमुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी वाया गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

COMMENTS