Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधिमंडळात निधीवाटपावरुन गदारोळ

विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते  मिळू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी विरोध केला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार होवूनही

नगरमध्ये लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार… ; प्रदेश भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा
पाच लाखाची लाच मागणारा एपीआय एसीबीच्या जाळ्यात
कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर

मुंबई/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते  मिळू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी विरोध केला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार होवूनही खातेवाटप करण्यास तब्बल 12-13 दिवसांचा कालावधी उलटला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अनेक बैठका होवूनही तोडगा निघत नसल्यामुळे अजित पवारांनी राजधानीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी निधीवाटपावरून गदारोळ बघायला मिळाला.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक निधी मिळत असल्याचा आरोप काँग्रेससह ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी याच मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी निधीवाटपात समानता आणण्याच्या मागणीसाठी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याने सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. निधीवाटपावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना 20 ते 40 कोटी रुपयांपर्यंत निधी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या ज्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती, त्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कामावरील स्थिगिती उठवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी निधीवाटपाच्या मुद्द्यावरून सत्ताधार्‍यांना सभागृहात चांगलेच धारेवर धरले. ’एखाद्या आमदाराला 50, कुणाला 60 कोटी रुपयांचा निधी दिला जातोय, तर कुणाला दोन कोटींचाही निधी दिला जात नाही. त्यामुळे या प्रकरणावर सरकारने भूमिका स्पष्ट करायला हवी’, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

निधी वाटपात घोटाळा ः खासदार राऊत – राज्य सरकारकडून आमदारांना होणार्‍या निधीवाटपात घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. निधीवाटप हा संशोधनाचा विषय असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. त्यामुळे आता निधीवाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार सत्तेतून बाहेर पडले होते. परंतु त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाल्याने शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटातही सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सत्ताधारी आमदारांनाच निधीवाटप ः अंबादास दानवे – निधीवाटपात सरकारने अन्याय केला, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे म्हणाले, सरकारने सत्ताधारी आमदारांनाच निधी वाटप केले आहे. विरोधी आमदारांना निधी न देऊन सरकारने जनतेवर अन्याय केला आहे. जनतेच्या करातूनच राज्याचा विकास होत असतो. ज्या मतदारसंघातील आमदारांना निधी वाटप केला नाही, तेथील जनतेने कर भरू नये का? असा सवाल दानवे यांनी केला आहे. दानवेंच्या प्रश्‍नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेमध्ये चांगलेच भडकले. तेव्हाच्या सरकारला हा शहाणपणा शिकवायला हवा होता, असे म्हणत फडणवीस यांनी दानवे यांना सुनावले.

COMMENTS