किनवट : बीड येथील मातंग समाजातील तरुण उमेश दळवी याच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ किनवट शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या न

किनवट : बीड येथील मातंग समाजातील तरुण उमेश दळवी याच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ किनवट शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ २७ मे रोजी मातंग समाज बांधव आणि जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले.
या प्रकरणातील नराधम आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, उमेश दळवी यांची झालेली अमानुष हत्या ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशी क्रूर घटना घडणे अत्यंत दुर्दैवी असून यामुळे दलित समाजामध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
- उमेश दळवी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि दोषींना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी.
- पीडित दळवी कुटुंबाला शासनाकडून तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
- पीडित कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.
शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, जितेंद्र कुलसंगे, कॉम्रेड जनार्दन काळे, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, गंगाधर मुकेनपेल्लीवार, दयानंद काळे, बालाजी कांबळे, बालाजी गायकवाड, ॲड. मिलिंद सरपे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS