जुन्नर : खेळण्या-बागडण्याच्या वयात मृत्यूने घाला घातल्याची एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून समोर आली आहे. बल्लाळवाडी येथे

जुन्नर : खेळण्या-बागडण्याच्या वयात मृत्यूने घाला घातल्याची एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून समोर आली आहे. बल्लाळवाडी येथे दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
जुन्नरमधील बल्लाळवाडी येथील ही घटना आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पवार आणि नवले कुटुंबातील दोन लहान मुले गाडेकर यांच्या शेतात खेळत होती. खेळता खेळता या चिमुकल्यांचा अंदाज चुकला आणि ती शेततळ्यात कोसळली.
बराच वेळ मुले घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली, तेव्हा ही काळजाचा थरकाप उडवणारी बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
शेतीसाठी वरदान ठरणारी शेततळी आता जीवघेणी ठरू लागली आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शेततळ्यांना संरक्षक जाळी किंवा कुंपण नसल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. प्रशासनाने आणि शेतकरी बांधवांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
दोन निष्पाप जीवांचा अंत झाल्याने बल्लाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS