Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाषा-संस्कृतीचे महत्व पालकांमध्ये रुजणे गरजेचे : प्रा. वैजनाथ महाजन

कामेरी : चर्चासत्रात मार्गदर्शन करताना वैजनाथ महाजन व्यासपीठावर प्रा. संजय ठिगळे, दीपक स्वामी, अजिंक्य कुंभार, बाळासाहेब पाटील व दि. बा. पाटील. इस

शिवप्रेमी प्रेक्षकांनी अनुभवला शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातील थरार
वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाषा-संस्कृतीचे महत्व मुलांच्यावर संस्कार करणार्‍या पालकांच्या मनामध्ये रुजणे गरजेचे आहेत. तरच मराठी भाषेची संस्कृती जपली जाणार आहे, असे विचार प्रा. वैजनाथ महाजन यांनी मांडले.
ते कामेरी तालुका वाळवा येथे श्री शिवाजी वाचनालय आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरावडानिमित्त आयोजित केलेल्या मराठी भाषा व ग्रंथ संस्कृती या विषयावरील चर्चासत्रात अध्यक्षपदावरुन बोलत होते.
महाजन म्हणाले, आठवीपर्यंतचे शिक्षण मुलांना मातृभाषेत मिळाले पाहिजे. ज्याला आपली मातृभाषा येत नाही त्याला कोणतीही भाषा येणार नाही. म्हणूनच आज मराठीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आज परदेशी माणसे येऊन मराठीचा व संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम यांच्या अभंगांचा अभ्यास करण्यासाठी मराठी भाषा आत्मसात करतात. परंतू आमच्या देशी माणसाला इंग्रजीचे आकर्षण वाटते ही गोष्ट मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने हानिकारक आहे. अखंड ज्ञान साधनेसाठी गावोगावी वाचनालय असणे गरजेचे आहे. कारण कविता कथा कादंबरी आणि संत साहित्य हे मानवी जीवनाला अवीट आनंद देते.
विश्‍वकोश मंडळाचे सदस्य प्रा. संजय ठिगळे म्हणाले, भाषा-संस्कृती भाषा संस्कार आणि भाषा संवर्धन या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याशिवाय खर्‍या अर्थाने मराठी भाषेचा विकास होणार नाही. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरणार्‍या तरुणाईने मराठी भाषा संवर्धनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे गरजेची आहे.
दि. बा. पाटील म्हणाले, खरेतर आज मराठी भाषा संवर्धनाचे काम लेखकांपासून होणे गरजेचे आहे. कारण अनेक लेखक मराठी कथा कादंबरी लिहिताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतात एवढेच नाही तर पुस्तक मराठीत असते. परंतू त्याचे शीर्षक हे इंग्रजीत असते. अशी उदाहरणे पाहायला मिळतात हे भाषा संवर्धनाच्या दृष्टीने दुर्दैवाचे आहे.
यावेळी वाळवा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास महेश पाटील, प्रकाश पाटील, अशोक कुंभार, रमेश खंडागळे, राम अण्णा पाटील, भारती पाटील, दिव्या बाबर, भास्कर पाटील, प्राचार्य अशोक पाटील, आकाराम पाटील, प्रा. डॉ. दीपक स्वामी, संग्राम पाटील, दौलत पाटील, किरण नांगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अशोक नीळकंठ यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार पाटील व अशोक पाटील यांनी केले तर आभार पोपट कुंभार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या वेळी श्री शिवाजी वाचनालयास प्रा. वैजनाथ महाजन व अ‍ॅड. बी. एस. पाटील अण्णा यांच्या वतीने काही ग्रंथ ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.

COMMENTS