Homeताज्या बातम्यासंपादकीय

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य !

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या एकूणच भवितव्य विषयक चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष

अन्यथा, माणसांची यंत्रे बनतील ! 
शांततापूर्ण सहअस्तित्वानेच जगाची भरभराट !
काॅंग्रेस पुन्हा जेष्ठांकडेच ! 

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या एकूणच भवितव्य विषयक चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकखांबी तंबू होता, हे आता स्पष्ट झाले आहे. दुसर्‍या फळीचं नेतृत्व शरद पवार यांनी जाणीवपूर्वक तयार केल्याचे दिसत नाही. पण, एक सुप्त विभागणी मात्र, त्यांनी करून ठेवली, ती म्हणजे केंद्रीय राजकारणात कन्या सुप्रिया सुळे यांना पुरेपूर वाव द्यायचा आणि राज्याच्या राजकारणात अजित पवार यांना मनसोक्त वाव द्यायचा. त्यातूनच अजित पवार यांनी अनेकवेळा आपला धडाका सत्ताकारणात दाखवला. आपल्याला आठवत असेलच छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अचानक त्यांना पद सोडावं लागलं होतं. डिसेंबर 2003 मध्ये छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. कारण, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पकड अजित पवार यांचीच तेंव्हाही होती अन् आताही आहे. ही पकड त्यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करून  गेली होती. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात एक प्रकारची निराशा आल्याचे दिसते. त्यातूनच जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा आला.  परंतु, जे अजित पवार अतिशय आक्रमक आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, त्यांच्याविषयी ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी सार्थपणे म्हटले की, देशात मोदी-शहा या जोडीला भले भले राजकीय नेते घाबरून असतात, परंतु, अजित पवारांनी या जोडीला पहाटेचा शपथविधी करून अन् आता मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत येऊन उल्लू बनवले. याचा अर्थ असा होतो की, अजित पवार हे निढळं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व जर कुणाला मिळायचे असेल तर ते अजित पवार यांनाच मिळायला हवे. कारण, पक्षनेतृत्व करताना जरब असणारं व्यक्तिमत्त्व हवं. राष्ट्रवादी काँग्रेस ला एकसंध ठेवण्याची भूमिका ते अगदी चोखपणे पार पाडतील, असा पक्षात विश्‍वास आहे. आजपर्यंत, त्यांना राज्यपातळीवरच शरद पवार यांनी ठेवल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांना प्रवेश मिळाला नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना दिल्यास ते नव्या पद्धतीने राजकारण करतील. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेस ला तिच्या स्थापनेपासून आतापर्यंत एक शल्य आहे की, राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आधीपासूनच आघाडी राहीली. त्यांच्यात एक फार्म्युला ठरला होता, जो आजही आहे की, आघाडीत ज्यांच्या जागा जास्त असतील त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पेक्षा जास्त जागा मिळूनही त्यांना मुख्यमंत्रीपद काँग्रेस ने दिले नव्हते; त्याऐवजी मंत्रीमंडळातील महत्वाची खाती त्यांच्याकडे घेतली होती. शरद पवार हे छुप्या आणि अनाकलनीय पध्दतीचे राजकारण करण्यात माहीर मानले जातात. तर, अजित पवार हे आपले राजकारण आक्रमकपणे रेटतात. अजित पवार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असूनही मुख्यमंत्रीपद त्यांना सातत्याने हुलकावणी देत राहिले. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळू न देणं, हे कदाचित शरद पवार यांनाच वाटत असावे. कारण, एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले की, राष्ट्रीय राजकारणातील दरवाजेही उघडतात. नेमकं शरद पवार यांना हे नको होते. त्यामुळे, एकप्रकारे त्यांनी अजित पवार यांची कोंडी केली. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार चा राजकीय उदय होऊ न देणे, ही देखील शरद पवार यांची खेळी मानली जाते. पार्थ पवार याचा पराभव होईल, असा मावळ मतदार संघ देऊन, शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राजकारणाला ब्रेक लावला. त्यामुळे, अस्वस्थ झालेले अजित पवार आज राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर, त्यांचे काय चुकले? कारण, राजकारण हा सत्ताकारणाचा अपरिहार्य भाग आहे. त्यातूनच अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी आतुर असले तर नैसर्गिक मानले पाहिजे. सर्व प्रकारची गुणवत्ता असूनही त्यांना मुख्यमंत्रपद सातत्याने हुलकावणी देत राहिले आहे.

COMMENTS