मुंबई: कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि NEET पेपरफुटी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व विद्या

मुंबई: कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि NEET पेपरफुटी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या रविवारी, २६ जुलै रोजी मुंबईत भव्य शक्तीप्रदर्शन मोर्चाची हाक दिली आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
हा मोर्चा मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथून निघून सिद्धीविनायक मंदिरापर्यंत जाणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर “आम्ही देवाला साकडं घालणार आहोत, या सरकारला सुबुद्धी मिळो असं साकडं घालून तिथे मोर्चाची सांगता होईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड संताप निर्माण झाल्याचे यावेळी दोन्ही नेत्यांनी नमूद केले.
सत्तेचा हा उद्दामपणा कशासाठी? – राज ठाकरे यांचा सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “शेतकरी आंदोलनाच्या वेळीही सरकार भेटायला तयार नव्हते, मणिपूरच्या वेळीही तेच झाले आणि आता विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच होत आहे. हा कसला सत्तेचा माज आहे? मी यापूर्वीच पंतप्रधान मोदींना NEET संदर्भात इशारा दिला होता. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या शिक्षण पद्धतीमुळे मुले आत्महत्या करतील हे मी आधीच सांगितले होते,” असे राज ठाकरे म्हणाले.
माजी गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांच्या जुन्या प्रसंगाची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले की, “मुंबईवरील हल्ल्यानंतर विधान केल्यावर आर. आर. पाटलांचा राजीनामा घेण्यात आला होता. मग आता या प्रकरणात शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी का घेऊ नये? हीच विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे. तिसऱ्यांदा पेपर फुटत असताना केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊ नका, ही आमची मागणी ऐकण्याची सत्तेमुळे सरकारची तयारी नव्हती. आता हा विषय केवळ शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापुरता मर्यादित राहिला नसून तो पंतप्रधान आणि गृहखात्यापर्यंत गेला आहे. पंतप्रधानांनी या मुलांना बोलावून चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती,” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS