बीड: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू होऊन तीन वर्ष झाले असून या धोरणात ज्या काही त्रुटी असतील त्या समजून घेऊन विद्यापीठाने व शासनाने त्या दूर कराव्य

बीड: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू होऊन तीन वर्ष झाले असून या धोरणात ज्या काही त्रुटी असतील त्या समजून घेऊन विद्यापीठाने व शासनाने त्या दूर कराव्यात. तसेच अंमलबजावणीसाठी आपण पूर्णपणे तयार आहोत का, याचाही विचार करणे गरजेचे आहे. आपली ग्रामीण भागातील महाविद्यालये भौतिक संसाधनांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत का, याचीही पडताळणी आवश्यक आहे. पारंपारिक शिक्षणाला कौशल्यांची व व्यावसायिक शिक्षणाची जोड या धोरणात आहे; परंतु प्राध्यापकांच्या मनात कार्यभाराच्या संदर्भात संभ्रम असून तो दूर करणे आवश्यक आहे. आज विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या बाबतीत उदासीन आहे, कारण त्यांना यातून नोकरी मिळत नाही, असे प्रतिपादन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयात दि. २ ऑगस्ट रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॉलेज टिचर्स असोसिएशन’ (बामुक्टा) व प्राचार्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रश्न, प्राध्यापक पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने निर्माण झालेले प्रश्न’ या विषयांवर सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आ. सतीश चव्हाण अध्यक्षीय समारोपात बोलत होते.
सभेचे उद्घाटक प्र-कुलगुरू डॉ. प्रविण वक्ते म्हणाले की, नवीन बदल सुरुवातीस कठीण वाटतो, पण समस्यांचे निराकरण झाल्यावर सर्व सुरळीत होते. विद्यार्थ्यांनी वर्गात आले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवल्यावर त्वरित मान्यता देण्याची व्यवस्था केली आहे.
या वेळी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. भास्कर साठे, बामुक्टोचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजी मदन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दत्ता भांगे, डॉ. अंकुश कदम, बामुक्टो अध्यक्ष डॉ. राजेश करपे, डॉ. अर्जून मोरे, डॉ. शंकर वाघमारे, डॉ. संतोष लहाने, डॉ. सचिन खिस्ते यांच्यासह अनेक प्राचार्य व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS