कसोटी शिवसेनेसह शिंदे गटाची

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कसोटी शिवसेनेसह शिंदे गटाची

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात आणि मुंबई महापालिकेवर कुणाचे

सत्ता-संघर्षाचे राजकारण
भ्रष्टाचार आणि अपयश  
केजरीवालांच्या अटकेचे टायमिंग !

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात आणि मुंबई महापालिकेवर कुणाचे वर्चस्व राहते, यावरून शिंदे गट आणि शिवसेनेचे पुढील भवितव्य ठरणार आहे. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेने दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.
दसरा मेळाव्याचा मोठा प्रभाव मुंबई महापालिका निवडणुकीवर पडणार असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे दसरा मेळाव्यात मतांचे राजकारण ठरणार यात शंका नाही. शिवाय शक्तीप्रदर्शन करून आम्हीच शिवसेना असल्याचा दोन्ही गटाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब करण्याचा दोन्ही गटाचा प्रयत्न असल्याचे एकंदरित दिसून येत आहे. रविवारी आदित्य ठाकरेंना धक्का देत वरळी मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. मात्र यातील खरी गोम म्हणजे, ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तेच पुन्हा रात्री शिवसेनेच्या मातोश्रीमध्ये उपस्थित होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. नेमके जावे कुणीकडे. आणि हा तिढा जोपर्यंत धनुष्यबाण चिन्हाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असणार यात शंका नाही. मात्र आम्हीच शिवसेना आहे, हे दाखवण्यासाठी आणि निवडणूक आयोगाकडील लढा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. शिंदे गटाने ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी 130 बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार यात कसलीही शंका नाही. एकवेळ धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात देखील येऊ शकते. 130 वकिलांच्या फौजेत मुकुल रोहतगी, नीरज कौल, अरविंद दातार, माजी महाधिवक्ता डायरस खंबाटा यांसारख्या ज्येष्ठ वरिष्ठ वकिलांसह सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांचे पुत्र वकिल श्रीयांश लळित यांनाही घेण्यात आले आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि तेथील पदाधिकार्‍यांकडून घेतलेली प्रतिज्ञापत्रे आयोगासमोर सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातूनही गटप्रमुखांपासून नेतेपदापर्यंतच्या पदाधिकार्‍यांची प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे सादर केली जाणार आहेत. त्यामुळे यातून शिवसेनेची तोन तृतीयांश कार्यकर्ते अधिक की शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी अधिक याची बेरीज व वजाबाकी येथे ठरणार आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने दोन्ही गटांना निवडणूक आयोग धनुष्यबाणाचे चिन्ह नाकारू शकतो. त्यामुळे अशा पेचात शिंदे आणि शिवसेना दोन्ही गट अडकू शकतो. अशावेळी नवीन चिन्हांवर निवडणूक लढायचे झाल्यास शिवसेनेची तयारी आहे का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. कारण अल्पावधीतच पक्षाचे चिन्ह जनसामान्यांत रुजवणे अवघड आहे. अशावेळी निवडणूक जिंकणे, पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहचवणे शिवसेनेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळ जसा शिवसेनेसाठी कठीण असणार आहे, तसाच तो शिंदे गटासाठी देखील कठीण असणार यात शंका नाही. अशावेळी राज्यात भाजप मोठे मैदान मारू शकतो, यात शंकाच नाही. त्यामुळे दसरा मेळावा यशस्वी करून, मोठी झेप घेण्याची तयारी शिंदे गटासह शिवसेना करतांना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी काळ हा मोठा संघर्षाचा बघायला मिळू शकतो. दसरा मेळाव्यात दोन्हीकडून तोफा धडाडणार, यात शंका नाही. दोन्ही बाजूने अनेक गौप्यस्फोट होणार, एकमेकांची उणी-दुणी काढली जाणार, मात्र यातून दोन्ही गटासमोर आपले आव्हान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. आणि ते आव्हान दोन्ही गट किती यशस्वीरित्या पेलतात, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालावरून स्पष्ट होईलच.

COMMENTS