बीड: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला हेक्टरी १७ हजार रुपयांचा पीक विमा तातडीने वितरित करावा, सन २०२० पासूनची थकीत पीक विम्याची रक्कम मिळ

बीड: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला हेक्टरी १७ हजार रुपयांचा पीक विमा तातडीने वितरित करावा, सन २०२० पासूनची थकीत पीक विम्याची रक्कम मिळावी तसेच कर्जमाफी योजनेतील त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफी लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे यांनी अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने जाहीर केलेला पीक विमा अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याची व्यथा मांडली. तसेच सन २०२० पासून प्रलंबित असलेली पीक विम्याची रक्कम तातडीने खात्यावर वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली.
कर्जमाफी योजनेतील त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहनपर लाभही अनेकांना मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने सर्व त्रुटी दूर करून सरसकट कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा, थकीत विमा रक्कम आणि सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा लढा असाच सुरूच राहील, असा इशारा राजेंद्र आमटे यांनी या प्रसंगी दिला.
या शिष्टमंडळात बाळासाहेब मोरे पाटील, राजू गायके, डॉ. गणेश ढवळे, अशोकराव येडे, भीमराव कुटे, मोहन जाधव, सुहास जायभाय, गणेश गायकवाड, गणेश मस्के, खाजा भाई पठाण, अर्जुन सोनवणे, महादेव आमटे, वैभव सोळुंके आणि दीपक आमटे यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS