भोकर शहरालगत असलेले आणि तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे नारवट वन पर्यटनस्थळ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. या पर्यट

भोकर शहरालगत असलेले आणि तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे नारवट वन पर्यटनस्थळ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. या पर्यटनस्थळी कथितरीत्या अवैध वीजवापर होत असल्याचा आरोप पुढे आला असून, महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची चर्चा सुरू आहे.
या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी माजी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन वनसंरक्षक यांच्या नियोजनातून येथे मंडप, शेड, उद्यान, दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती आणि अन्य सुविधा उभारण्यात आल्याने हे ठिकाण नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मात्र, येथे वीजपुरवठ्यासाठी अधिकृत महावितरण जोडणी आहे की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोअरवेल, विद्युत खांब व इतर उपकरणांसाठी कथितरीत्या अवैधरीत्या वीज वापरली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी विद्युत तारा उघड्यावर आणि जमिनीवर पडलेल्या असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथे येणार्या पर्यटकांसह लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात एखादा विद्युत अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वन विभागाचे अधिकारी अंगद खटाने हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातील या कथित प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच महावितरण विभागानेही या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, शासनाचे लाखो रुपयांचे वीजबिल बुडाल्याची चर्चा आहे. दरम्यान, संबंधित अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच नारवट वन पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा विनियोग नियमानुसार झाला आहे का, याचीही उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पर्यटक, नागरिक आणि निसर्गप्रेमींकडून जोर धरत आहे.

COMMENTS