नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा संरक्षक

नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा संरक्षक (रिटेनिंग) भाग अचानक कोसळल्याच्या घटनेने राज्य शासनाला हादरा दिला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा किंवा संबंधित यंत्रणेकडून झालेली हलगर्जीपणा आढळल्यास जबाबदार अधिकारी, अभियंते, कंत्राटदार अथवा संबंधित यंत्रणांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. चौकशी अहवालाच्या आधारे कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री अतुल सावे यांनी दिला.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सावे यांनी जिल्हा प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उड्डाणपुलाची संपूर्ण संरचनात्मक स्थिरता तपासण्याचे तसेच भविष्यात कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. या घटनेच्या तांत्रिक तपासणीसाठी केंद्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे पथक दिल्लीहून नांदेडमध्ये दाखल होणार असून, ते घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने रस्त्यावर पडलेला मलबा हटवून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा प्रकार सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण उड्डाणपुलाची सखोल तांत्रिक तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दोषींना अभय नाही; दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही
पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही विकासकामात दर्जाबाबत तडजोड सहन केली जाणार नाही. चौकशीत दोषी आढळणारे अधिकारी, अभियंते, कंत्राटदार किंवा संबंधित यंत्रणांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या कामांमध्ये निष्काळजीपणाला कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
केंद्रीय तज्ज्ञांचे पथक करणार घटनास्थळाची तपासणी
उड्डाणपुलाच्या घटनेची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय तांत्रिक तज्ज्ञांचे विशेष पथक नांदेडमध्ये दाखल होणार आहे. हे पथक उड्डाणपुलाची रचना, बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य तसेच दुर्घटनेमागील नेमकी कारणे तपासून शासनाला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार असून, दोषींविरुद्ध कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS