Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टीची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्

मुंबईत मॉडेलकडून सेक्स व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग
लग्न समारंभात फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत 100 जणांचा होरपळून मृत्यू
दंत चिकित्सा शिबीराचा 51 रुग्नानी घेतला लाभ

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभारला आहे. अशातच आता ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून ते याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी समता पार्टीला खतपाणी कोण घालत आहे? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. समता पार्टी काय करत आहे. त्यांना कोण खतपाणी घालत आहे. या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही. निवडणूक आयोगाने आमचे चिन्ह गोठवल्यानंतर आम्हाला मशाल हे चिन्ह दिले. याच चिन्हावर आम्ही पोटनिवडणूक जिंकलो. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गावर अशाप्रकारे कोणी रोडे घालत असतील, तर हे लोकशाहीसाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल देसाई यांनी दिली. निवडणूक आयोगाने जेव्हा आम्हाला मशाल हे चिन्ह दिले. त्यावेळी समता पार्टीचे अस्थित्व, त्याचे चिन्ह कधी गोठवण्यात आले, ते कधी फ्री करण्यात आले. याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला हे चिन्ह दिले, तेव्हा कोणीतरी येते आणि त्या चिन्हावर दावा सांगतो, हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण टीकणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबतही प्रतिक्रिया दिली.  सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून सविस्तर भूमिका मांडली जाईल. त्यानंतरच न्यायालय निकाल देईल. पण निर्णय लगेच लागण्याची शक्यता कमी आहे. कदाचित मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय येण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी होईपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडेच राहिल, असा निर्णय दिला आहे.

COMMENTS